Top 10 News : ‘डिनर डिप्लोमसी’ने अकोल्यात राजकीय चर्चांना उधाण ,‘गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री’ आणि अनुराग कश्यप पुन्हा एकदा प्रेमात ,वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : अकोल्यात काँग्रेसचे माजी लोकसभा उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला आहे.

अभय पाटलांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चांना वेग
‘डिनर डिप्लोमसी’ने अकोल्यात राजकीय चर्चांना उधाण
Top 10 News : अकोल्यात काँग्रेसचे माजी लोकसभा उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ॲड. निलेश देशमुख यांनी पाटील यांच्या टॉवर चौकातील निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी त्यांनी एकत्र जेवणही केले. काही दिवसांपूर्वी डॉ. पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. आता पुढील दोन दिवसांत समर्थकांची बैठक घेऊन पाटील राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी 4 लाख 16 हजार मते घेतली होती.
जयकुमार गोरे-अंधारे वाद पुन्हा पेटला;
‘कॉप्या करून पास झालेले मंत्री’ म्हणत निशाणा
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यातील शाब्दिक वाद पुन्हा रंगला आहे. सोलापूर दौऱ्यात अंधारे यांनी गोरेंवर आरोप केल्यानंतर गोरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे गोरेंवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. ‘जयकुमार गोरे हे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. संस्कार असतील की नाही, याबद्दल शंकाच आहे. पत्रकार परिषद घेताना थोडं कमी पीत चला,’ असा टोला त्यांनी लगावला. तसेच, गोरेंच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित करत अंधारे यांनी, ‘तुम्ही मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलता का?’ असा प्रश्नही केला.
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून वाद
संपूर्ण गीत न म्हटल्याने कार्यक्रमात गोंधळ
सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनानिमित्त GNZ सोबत सामूहिक राष्ट्रगानाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. मात्र, संपूर्ण गीत न म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमातही ‘वंदे मातरम्’ गायले गेले होते. त्यावरून भाजपने काँग्रेसवर टीका केली होती. दरम्यान, कार्यक्रमानंतर प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी, देशाला हुकूमशाहीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी Gen-Z सोबत खांद्याला खांदा लावून लढणार असल्याचे म्हटले.
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार;
‘या’ ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, सातारा, पुणे, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा;
सोमेश्वर कारखान्याचा विक्रमी ४ हजारांचा दर Top 10 News :
पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील ऊसाला अनुदानासह प्रतिटन ४ हजार रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान तुटणाऱ्या उसासाठी ३८००, फेब्रुवारीसाठी ३९०० आणि मार्चमध्ये तुटणाऱ्या उसासाठी ४ हजार रुपये प्रतिटन दर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याची २०२५-२६ हंगामाची एफआरपी ३२८५ रुपये होती. त्यामुळे नव्या दरामुळे एफआरपीपेक्षा प्रतिटन ५१५ रुपये अधिक मिळणार असल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे.
“मी मनापासून माफी मागतो”
NALSAR वादावर बार कौन्सिल अध्यक्षांची माफी
हैदराबादच्या NALSAR विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यास विरोध केला होता. या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने कारवाई करत २०२६च्या बॅचची नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. या कारवाईवर टीका झाल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार मनन कुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली. विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मनापासून खेद व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं. तसेच या प्रकरणाला राजकीय किंवा अनावश्यक वळण देऊ नये, असंही आवाहन केलं.
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर भारताची भूमिका स्पष्ट;
अंतिम निर्णय न्यायालयाचा
बांगलादेश सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी पुन्हा केली आहे. मात्र, भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रत्यार्पणाबाबतचा अंतिम निर्णय राजकीय किंवा राजनैतिक पातळीवर नव्हे, तर भारतीय न्यायव्यवस्थेकडून घेतला जाईल. यासाठी हसीना यांच्यावर बांगलादेशात दाखल असलेले गुन्हे भारतीय कायद्यानुसारही गुन्हे ठरतात का, याचा विचार केला जाईल. बांगलादेशने २०१३ च्या प्रत्यार्पण करारानुसार आवश्यक कागदपत्रे भारताकडे दिल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पाकिस्तानातील हिंदू तिथल्या हिंदूंपेक्षा जास्त आनंदी
आसिफ अली झरदारींचं वक्तव्य चर्चेत
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचं हिंदूंबाबतचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. पाकिस्तानातील हिंदू भारतातील हिंदूंपेक्षा अधिक आनंदी असल्याचा दावा झरदारी यांनी एका कार्यक्रमात केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानी मुस्लिम हिंदूंबाबत सहिष्णुता बाळगतात आणि त्यामुळे ते पाकिस्तानात अधिक मुक्त व सुस्थितीत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, भारतातील लोकांचा दृष्टिकोन वेगळा असल्याचंही झरदारी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती आणि मानवी हक्कांबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाच झरदारींचं हे वक्तव्य समोर आलं आहे.
शतकाच्या उंबरठ्यावर राहुलला दुखापत;
७७ धावांवर रिटायर्ड हर्ट
भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. सलामीवीर केएल राहुलला उजव्या हातात वेदना आणि बोटांमध्ये क्रॅम्प्सचा त्रास झाल्याने ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. राहुलने देवदत्त पडिक्कलसोबत १५० धावांची शानदार भागीदारी केली. मात्र शतकाच्या जवळ पोहोचताच त्याला अचानक त्रास जाणवला. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये उपचार करूनही वेदना कमी न झाल्याने राहुलला माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात आला. राहुलच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अनुराग कश्यप पुन्हा एकदा प्रेमात
नातं गमवायचं नाही म्हणत दिली प्रेमाची कबुली Top 10 News :
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत अनुरागने शुभ्रा शेट्टीसोबत गेल्या १० वर्षांपासून नात्यात असल्याचं सांगितलं. तिसऱ्यांदा लग्न करण्याबाबत विचारलं असता, ‘शुभ्राचा लग्नावर विश्वास नाही,’ असं त्याने सांगितलं. वयातील फरकामुळे एका काळात असुरक्षित वाटत असल्याचाही अनुरागने खुलासा केला. ‘मी तिच्यासोबत खूप खूश आहे आणि मला हे नातं गमवायचं नाही,’ असं तो म्हणाला. शुभ्रानेही त्यांच्या नात्यातील सुरुवातीच्या आठवणी सांगितल्या. अनुरागचं यापूर्वी आरती बजाज आणि कल्की कोचलिन यांच्याशी लग्न झालं होतं.





