Top 10 News : ..तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील ते बोट उलटून १५ जणांचा मृत्यू..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : Top 10 News : ..तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील ते बोट उलटून १५ जणांचा मृत्यू..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : 1) पुणेकरांचा भावपूर्ण निरोप! माऊलींच्या पालखीचे सासवडकडे प्रस्थान
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज पहाटे पुण्यातील विठोबा मंदिरातून सासवडकडे प्रस्थान केले. सकाळी सहा वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड जयघोषात पालखी मार्गस्थ झाली. हजारो वारकरी भक्त पालखीसोबत आषाढी वारीत सहभागी झाले असून पुणेकरांनी माऊलींना भावपूर्ण निरोप दिला. वारीतील सर्वाधिक आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दिवेघाटाची चढाई वारकरी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत उत्साहाने पार केला. त्यानंतर आजचा मुक्काम संत सोपानकाकांची नगरी सासवड येथे होणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या भक्तीभावाने संपूर्ण मार्ग विठ्ठलनामाने दुमदुमून गेला असून दिवेघाट परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे अनोखे वातावरण पाहायला मिळत आहे. (Top 10 News)
2) “फडणवीस दिल्लीत गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा करत नवी चर्चा सुरू केलीय. देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे हेच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात मजबूत दावेदार ठरतील, असं संजय राऊत म्हणालेत. फडणवीस स्वतःही बावनकुळे यांच्या नावाची शिफारस करतील, असा दावाही त्यांनी केलाय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे स्पष्ट सांगत राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या नावालाही फेटाळले. तसेच सिद्धिविनायक मंदिराच्या निधीवरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांनी अयोध्या राम मंदिर प्रकरणावरही सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेनेच्या ‘रामरक्षा आंदोलनाच्या’ दुसऱ्या टप्प्याची घोषणा त्यांनी केली. (Top 10 News)
3) पवार कुटुंबात पुन्हा सनई-चौघडे! 29 जुलैला पार्थ पवार-कायनात धार यांचा साखरपुडा
पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात पार पडणार आहे. नुकताच सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार यांनी एकत्र उपस्थिती लावल्याने त्यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. कायनात धार या मूळच्या हरियाणातील असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्या पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होताना दिसल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. आता त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत माहिती समोर आल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. (Top 10 News)
4) अरबाज शेखच्या व्हिडिओची एकनाथ शिंदेंनी घेतली दखल; वडिलांसाठी दिला मदतीचा हात
‘सैराट’ चित्रपटात सल्याची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेखच्या भावनिक आवाहनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत मदतीचा हात पुढे केलाय. ब्रेन हॅमरेज झालेल्या वडिलांच्या उपचारांसाठी होत असलेल्या आर्थिक अडचणी आणि रुग्णालयातील खर्चाबाबत अरबाजने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. चिवटे यांनी सोलापुरात जाऊन अरबाज आणि त्याच्या वडिलांची भेट घेत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर उपचारांसाठी आवश्यक सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर संस्थांच्या माध्यमातूनही उपचारांचा खर्च उचलण्यासाठी मदत केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलीय. (Top 10 News)
5) भाजपात उमेदवारीवरून रणकंदन! महामार्ग रोखला, दगडफेक; 6 पोलीस जखमी
मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी नाकारत आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षात मोठा वाद निर्माण झालाय. संतप्त समर्थकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी बाजारपेठ बंद पाडत महामार्गावर रास्तारोको केला, त्यामुळे सुमारे 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असता परिस्थिती चिघळली आणि आंदोलकांनी दगडफेक केली. या घटनेत पोलीस अधीक्षक मयूर खंडेलवाल यांच्यासह सहा पोलीस जखमी झाले. दतिया मतदारसंघात 30 जुलै रोजी मतदान, तर 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. (Top 10 News)
6) व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू
व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून भीषण दुर्घटना घडली असून, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केलीय. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे घटनेबाबत दु:ख व्यक्त करत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले. तसेच दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असून दुर्घटनेची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. जखमी आणि बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू असून भारतीय नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी दूतावास सक्रिय झाला आहे. या दुर्घटनेमुळे भारतीय पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. (Top 10 News)
7) SUV प्रेमींसाठी खुशखबर! हुंडई आणणार दोन नवीन गाड्या; मारुती-महिंद्राची वाढणार टेन्शन
भारतीय SUV बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी हुंडई पुढील दोन वर्षांत दोन नवीन SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यातील पहिली मिड-साईज SUV व्हेन्यू आणि क्रेटा यांच्या दरम्यान स्थान मिळवेल. सुमारे 4.18 मीटर लांबीची ही कार 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत बाजारात येण्याची शक्यता असून पेट्रोलसह CNG पर्यायही उपलब्ध असेल. तर दुसरी प्रीमियम 7-सीटर SUV 2027 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ही SUV लाँग-व्हीलबेस टक्सनवर आधारित असून हायब्रिड पॉवरट्रेन, ADAS, LED लाइटिंग, मोठी ग्रिल आणि आधुनिक फीचर्ससह येईल. लॉन्चनंतर या गाड्यांची थेट टक्कर मारुतीच्या आगामी मॉडेल्स, महिंद्रा XUV 7XO, टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस आणि इतर प्रीमियम SUV सोबत होणार आहे. (Top 10 News)
8) मोबाईल रिचार्ज होणार स्वस्त? TRAI चा मोठा प्रस्ताव; कॉल-SMS प्लॅन्समुळे ग्राहकांची मोठी बचत
मोबाईल ग्राहकांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमावली 2026’ चा मसुदा जारी करत टेलिकॉम कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन्स आणणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयामुळे डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांना 50 ते 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त प्लॅन्स मिळू शकतात. सध्या 300 रुपयांचा प्लॅन भविष्यात 100 ते 150 रुपयांत उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या प्रस्तावाचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिक, फीचर फोन वापरणारे, ग्रामीण भागातील ग्राहक, सेकंडरी सिम वापरणारे आणि घरात किंवा कार्यालयात वायफाय वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. अंतिम मंजुरीनंतर कंपन्यांना समान वैधतेचे कॉल-एसएमएस प्लॅन्स उपलब्ध करावे लागतील. (Top 10 News)
09) आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून वाद; बजरंग दलाचे आंदोलन
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नानंतर बिहारमधील फोर्ब्सगंज येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्याचा पुतळा जाळला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’चे आरोप केले. बजरंग दलाचे नेते मनोज सोनी यांनी आमिर हिंदू समाजाला लक्ष्य करत असल्याचा दावा केला आणि त्याच्यावर तीव्र टीका केली. तसेच अशा कृती सुरू ठेवल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. दरम्यान, आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ता, 2005 मध्ये किरण राव यांच्याशी विवाह केला होता. दोन्ही विवाह संपुष्टात आल्यानंतर 5 जुलै 2026 रोजी त्याने गौरी स्प्रॅटसोबत तिसरे लग्न केले. या घटनेनंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत असून प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. (Top 10 News)
10) विम्बल्डनमध्ये सचिनसोबत दिसला शुबमन गिल; सोशल मीडियावर ‘नातं पक्कं समजा’च्या चर्चा!
१४ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी भारताचा कर्णधार शुबमन गिल विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा आनंद घेताना दिसला. विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये शुबमन गिल थेट क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्यासोबत बसला होता. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी सारा तेंडुलकर आणि शुबमनच्या कथित नात्यावरून कमेंट्सचा पूर आणला. युझर्सनी “आता तर नातं पक्कं समजा” आणि “सासरा-जावयाची जोडी भारी आहे” अशा मजेशीर कमेंट्स केल्या. या मालिकेत रोहित, विराट आणि बुमराह यांचेही पुनरागमन होणार आहे. (Top 10 News)




