Top 10 News : शरद पवार-शिंदेंची बैठक का झाली?, मोशी दुर्घटनेच्या 40 तासानंतरही बचावकार्य सुरूच आणि ‘देव खेळ’ वेब सिरीजवर वाद, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

शरद पवार-शिंदेंची बैठक का झाली?
जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण
Top 10 News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आमदारांची बैठक घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या होत्या. यावर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत असल्याची टीका केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते जयंत पाटील यांनी या बैठकीमागचे कारण स्पष्ट केले. सीमा प्रश्नावरील बैठक संपल्यानंतर आमदारांना शरद पवार यांच्याशी चर्चा करायची होती. त्यांच्या प्रकृतीमुळे जास्त अंतर चालणे शक्य नसल्याने जवळच असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या दालनात बसून चर्चा करण्यात आली. यात कोणताही राजकीय संदेश किंवा वेगळा अर्थ नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मोशी दुर्घटनेच्या 40 तासानंतरही बचावकार्य सुरूच;
ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्याला 40 तासांहून अधिक काळ उलटला असून, अद्याप 8 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला इमारतीचे मजले पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तो धोकादायक ठरू शकत असल्याने बचावकार्याची रणनीती बदलण्यात आली. आता प्रथम इमारतीभोवतालचा कचरा हटवून नंतर आतील कचरा बाहेर काढत अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. पिंपरी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही दुर्घटना ‘नैसर्गिक’ असल्याचे म्हटल्याने आणि कंत्राटदाराला क्लीन चिट दिल्याच्या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नांदेडमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळला;
सुदैवाने जीवितहानी टळली
नांदेड-लातूर महामार्गावरील विष्णुपूरी याठिकाणी श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून जवळच शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि अनेक शैक्षणिक संस्था असल्याने मोठी दुर्घटना टळली. संबंधित रस्त्याचे काम अद्याप सुरू असतानाच पुलाचा भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पुलाची तातडीने तपासणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय.
राज्यात पावसाला ब्रेक;
पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी
राज्यात आठवडाभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असून शुक्रवारी कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना मात्र पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ग्रीन अलर्ट कायम असून मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे तसेच इतर काही भागांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना काही दिवस मुसळधार पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पुणेकरांच्या पाण्याचं टेन्शन मिटलं
खडकवासला धरण १०० टक्के भरलं Top 10 News :
पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, एकूण साठा 56 टक्क्यांवर पोहोचला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने पुणेकरांची पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत धरणांमध्ये सुमारे 13 टक्के कमी पाणीसाठा असला, तरी गेल्या आठ दिवसांच्या जोरदार पावसामुळे वर्षभरासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
TMC च्या तिघांना भाजपप्रवेशानंतर राज्यसभेची उमेदवारी,
एनडीएचे संख्याबळ वाढणार
पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या तीन रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपने सुष्मिता देव, सुखेंदु रे आणि प्रकाश बराईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या तिघांना उमेदवारी देण्यात आली. पश्चिम बंगाल विधानसभेतील भाजपच्या संख्याबळामुळे या तिन्ही जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राज्यसभेत भाजपच्या जागांमध्ये तीनची भर पडणार असून, एनडीएचे संख्याबळ 154 वरून 157 होण्याची शक्यता आहे. दोन-तृतीयांश बहुमतासाठी एनडीएला त्यानंतर आणखी नऊ खासदारांची गरज राहणार आहे. तृणमूल काँग्रेसमधील फूट आणि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
जागतिक नोकरकपातीचा फटका;
भारत दुसऱ्या क्रमांकावर,
खर्च कपात आणि उत्पादकता वाढवण्याच्या धोरणामुळे जगभरातील टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरूच असून, १ जुलै २०२६ पर्यंत १ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लेऑफ्स.एफवायआयच्या अहवालानुसार, या नोकरकपातीत ७१.३३ टक्के वाट्यासह अमेरिका पहिल्या, तर ७.१६ टक्के वाट्यासह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून, ऑनलाइन शिक्षणाची घटती मागणी आणि एआयच्या वाढत्या वापरामुळे २१.६७ टक्के नोकऱ्या कमी झाल्या आहेत. फायनान्स आणि फूड डिलिव्हरी क्षेत्रातही मोठी कर्मचारी कपात झाली. मात्र दुसरीकडे, एआय आणि मशीन लर्निंगशी संबंधित नोकऱ्यांमध्ये २५ टक्के वाढ झाली असून, ‘जॉबस्पीक’ अहवालानुसार जून महिन्यात एआय क्षेत्रातील भरतीत १६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
चीनमधील शू फॅक्ट्रीला भीषण आग;
28 जण होरपळले
चीनच्या फुजियान प्रांतातील जिनजियांग शहरातील हुईटेंग शूज फॅक्ट्रीला लागलेल्या भीषण आगीत 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुपारी लागलेली आग काही मिनिटांत संपूर्ण इमारतीत पसरल्याने मोठी जीवितहानी झाली. आग विझवण्यासाठी 183 अग्निशमन जवान आणि 35 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दाट धुराचे लोट, उंच ज्वाळा आणि छतावर अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न दिसून येतायत. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने बचावकार्य वेगाने राबवण्याचे, जखमींवर उपचार करण्याचे आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. आगीचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.
आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली
कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
ब्रिस्टलमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेत मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. वैभव सूर्यवंशी , इशान किशन आणि अभिषेक शर्मा अशा धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 80 धावांची दमदार खेळी करत भारताला 158 धावांपर्यंत मजल मारून दिली. शिवम दुबेने 22 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. या पराभवासह भारताने सलग दुसरी टी-20 मालिका गमावली.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विशेषतः भारतीय फलंदाजीतील सातत्याने होणारे अपयश चिंतेचा विषय ठरत आहे.
‘देव खेळ’ वेब सिरीजवर वाद;
आशिष शेलारांचे कारवाईचे आश्वासन Top 10 News :
अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘देव खेळ’ वेब सिरीजवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत वाद निर्माण झाला आहे. गुहागर परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या शंकासूर देवतेचे चित्रण आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत कोकणातील नागरिकांनी या सिरीजवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत या वेब सिरीजवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. शंकासूर ही लोकश्रद्धेतील देवता असून लोककलेच्या परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस कारवाईसह केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयालाही माहिती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे शेलार म्हणाले. सात भागांच्या या वेब सिरीजचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केले असून त्यात वीणा जामकर, ओंकार भोजने आणि मंगेश देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.




