TOP 10 News: फडणवीसांचे पंतप्रधान मोदीजींसाठी विठुरायाकडे साकडं ते राष्ट्रपतींचा तडकाफडकी राजीनामा; जाणून घ्या Top10 News…
TOP 10 News: राज्य, देश-विदेश, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी...!

TOP 10 News: 1. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा;
‘माने दाम्पत्य’ ठरले मानाचे वारकरी
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावचे शेतकरी बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती बाळासाहेब माने या वारकरी दांपत्याला यंदाचे ‘मानाचे वारकरी’ म्हणून पूजा करण्याचा सन्मान लाभला. विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाल्याने माने दांपत्याने अत्यंत भावूक होऊन आनंद व्यक्त केला. 70 वर्षीय बाळासाहेब माने हे शेतकरी असून ते गेल्या 20 वर्षापासून आळंदी पंढरपूर पायी वारी करतात. यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आले आहेत. मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हा रांगेत प्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून निवड केली.
2. फडणवीसांचे पंतप्रधान मोदीजींसाठी विठुरायाकडे साकडं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विठुरायाकडे साकडं घातल्याचे सांगितले आहे. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईसाठी एक नवीन अध्याय सुरु केला आहे. या तरुणाईला दिशा द्यायला आशा आकांक्षा पूर्ण करायला. मोदीजी हा नवा अध्याय लिहत आहेत. त्यातही पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याशिवाय त्यांनी खरीपाचा हंगाम चांगला झाला तर शेतकरी सुखी होतो, राज्य सुखी होते. राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेतकऱ्यांच्या जीवनातआनंद यावा, ही माझी विठुरायाच्या चरणी प्रार्थना आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडोअरबाबतही भाष्य करत, पंढरपूर कॉरिडोअरचं काम यावर्षी सुरु झाले पाहिजे. त्यासाठी दोन-अडीच वर्षे लागतील. या कामाविषयी 80 ते 90 टक्के लोकांच्या शंका दूर झाल्या असल्याचे सांगितले.
3. आजही मुसळधार पावसाचा अंदाज; अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम राहणार आहे. याठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
4. ‘तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा’
नीट पेपरफुटीवरून जंतर -मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे आता देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील शिवारीज पार्क मैदानात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील भेट दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. “मी तमाम देशबांधवांना सांगतोय, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ठीक आहे, मी आता सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदूका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदूका घेऊन या, मी तिरंगा घेऊन येतो. बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
5. पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा; सोप्या पद्धतीने तपासा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे व्याज पीएफ खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अनेक खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना अद्याप पासबुकमध्ये व्याज जमा झाल्याचे दिसत नाही. याकरिता पीएफ खात्यातील व्याजाची माहिती जाणून घेण्यासाठी UMANG अॅपचा वापर करता येतो. सर्वप्रथम UMANG अॅप उघडा आणि त्यामधील EPFO पर्याय निवडा. त्यानंतर आपल्या UAN क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा. लॉगिन झाल्यानंतर पासबुक किंवा खात्याशी संबंधित माहिती पाहून व्याज जमा झाले आहे का हे तपासता येते. याशिवाय जर तुमचा मोबाईल क्रमांक अगोदरच UAN शी लिंक असेल आणि KYC अपडेट केले असेल तर विना इंटरनेट सुद्धा तुम्ही PF खात्यातील बचतीची आणि व्याजाची माहिती घेऊ शकता. त्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकवर मिस्ड कॉल द्या काही वेळेत तुमच्या मोबाईलवर PF बॅलन्सविषयीची माहिती SMS द्वारे मिळेल.
6. “मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?” आरोपांवर वांगचुक यांचे प्रत्युत्तर
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत ‘डील’ केल्याचे आरोप करण्यात आले. मात्र त्यांनी हे सर्व आरोप फेटाळत NEET-UG पेपर लीक आणि परीक्षेशी संबंधित इतर गैरव्यवहारांविरुद्ध न्यायासाठी जवळपास महिनाभर उपोषण केल्यानंतरही त्यांना आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का? असा सवाल टीका करणाऱ्यांना केला आहे. ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हंटले की, “विद्यार्थ्यांसाठी २६ दिवस उपोषण केल्यानंतर, ११ किलो वजन कमी झाल्यावर आणि लडाखच्या प्रचंड थंडीतून थेट दिल्लीच्या कडक उन्हात हे सर्व सहन केल्यानंतर, माझं उपोषण किती पवित्र होते, मी ते कोणाच्या हातून सोडलं किंवा मी काही तडजोड केली की नाही, याचे चारित्र्य प्रमाणपत्र मला कोणाकडून घेण्याची गरज आहे का? मी कोणालाही दोष देत नाही, कारण तुमच्यापैकी बहुतेकांना मी कोणत्या परिस्थितीतून गेलो आहे याची कल्पना नाही,” असे म्हणत सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
7. अधिवेशनाचा पहिला आठवडा पूर्णपणे वाया
नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वाया गेला. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा व राज्यसभेत कोणतेही महत्त्वाचे कामकाज न होता दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. सरकारने विनाकारण अटी घालून चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप विरोधकांवर केला, तर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा होणार नाही, यावर विरोधक ठाम राहिले. दरम्यान, राज्यसभेत गृहमंत्रालयाने ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक’ मांडले, ज्यानुसार ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे. १३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात गोंधळामुळे पहिल्या आठवड्यात केवळ एकच विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडले जाऊ शकले.
8. राजकीय भूकंप! राष्ट्रपतींचा तडकाफडकी राजीनामा
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संविधानातील कलम ५०(३) नुसार राष्ट्रपतींनी आपला राजीनामा संसदेच्या सभापतींकडे सादर केला. अधिकृतरीत्या त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयामागे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संपर्क साधल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात लंडन दौऱ्यावर असताना मोहम्मद शहाबुद्दीन यांनी शेख हसीना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात राजकीय दबाव वाढल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणीही काही दिवसांपासून होत होती. अखेर शेख हसीना यांच्यासोबत संपर्क साधणे मोहम्मद शहाबुद्दीन यांना महागात पडले. दरम्यान, माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात असून, त्या सप्टेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याबाबत वक्तव्य केल्याचेही वृत्त आहे. मात्र, त्यांच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
9. संघर्षावर मात करत झंडू कुमारने कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकलं कांस्यपदक
कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी स्विमिंग, बॉक्सिंग आणि लॉन बॉल्समध्ये दमदार कामगिरी केली. यात २८ वर्षीय पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमारने पुरुषांच्या ‘हेव्हीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग’ प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताला या स्पर्धेतील पहिलेच पदक मिळवून दिले. स्पर्धेत झंडूने अनुक्रमे १८१ किलो आणि १९० किलो वजनाचे यशस्वी लिफ्टिंग करत १३०.९ गुण मिळवले. लहानपणी पोलिओचा सामना केलेला बिहारचा झंडू कुमार अत्यंत बिकट परिस्थितीतून पुढे आला आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने भाजी विकली आणि ई-रिक्षा चालवली. २०२३ मध्ये नॅशनल चॅम्पियनशिपसाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने स्वतःची गाडीही विकली होती. २०२२ मध्ये पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये पदार्पण करणाऱ्या झंडूने राष्ट्रीय रेकॉर्ड मोडून ‘खेलो इंडिया’ व ‘वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड कप’ आणि ‘एशिया-ओशियन ओपन चॅम्पियनशिप’ या स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. त्याची ही संघर्षाची यशोगाथा आज देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
10. ‘आजच्या पिढीने गांधी आणि आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला’
अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी अलिकडेच देशभरात सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली आहे. अतुल कुलकर्णींनी या पोस्टच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना एक संदेश दिला आहे. ज्यात त्यांनी म्हंटले की, ‘या चळवळीच्या माध्यमातून, आजच्या पिढीने गांधी आणि आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला आहे. माझ्या पिढीने आणि आमच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांनी सातत्याने त्यांची नावे घेतली आहेत, आम्ही आमच्या कृतींमधून त्यांचे विचार जवळजवळ पूर्णपणे पुसून टाकले होते. प्रत्येक क्षेत्रात: शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय सर्वच क्षेत्रांमध्ये. सध्याच्या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. आता आपण किमान हे तरी केले पाहिजे; जागे व्हा, जबाबदारी घ्या आणि या तरुणांना पाठिंबा द्या’,” असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. सध्या अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
Pune District : श्री आदिवासी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान







