Top 10 News : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते देवेंद्र फडणवीस नवे शिक्षणमंत्री?…; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते देवेंद्र फडणवीस नवे शिक्षणमंत्री?...; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : १ ) देवेंद्र फडणवीस नवे शिक्षणमंत्री होणार, संजय राऊत यांचा मोठा दावा
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चांना उधाण आलेय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रीपदाची संधी मिळू शकते, असा मोठा दावा केलाय. फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी, “ते शिक्षित आहेत, कायद्याचे जाणकार आहेत आणि विविध विषयांवर प्रभावीपणे भूमिका मांडतात. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी त्यांची निवड होण्याची शक्यता आहे,” असे म्हटले. याचवेळी राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे सांगत, गेल्या बारा वर्षांत प्रथमच जनआंदोलनाच्या दबावामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागल्याचा दावाही केला. (Top 10 News)
२ ) धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तरी मोर्चा कायम; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही उद्याचा मुंबईतील मोर्चा रद्द होणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेय. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “राजीनामा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण आंदोलन संपलेले नाही. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, दाखल झालेले गुन्हे आणि पोलिसांच्या कारवाईबाबत उत्तर मिळाले पाहिजे,” असे म्हटले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत ही युवाशक्तीच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले. उद्याचा कार्यक्रम पूर्वनियोजितप्रमाणे शिवाजी पार्क परिसरातच होणार असून, पुढील आंदोलनाची दिशा विद्यार्थी नेत्यांशी चर्चा करून ठरवली जाईल, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली. (Top 10 News)
३ ) धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा दावा
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा दावा केलाय. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद व्हावा यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. “लोकशाहीत संवाद आवश्यक आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करावी किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती मी मोदींना केली होती. त्या चर्चेचाच परिणाम आज दिसला,” असे पवार म्हणाले. तसेच आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर टाळता आला असता, असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या संयमी आंदोलनाचे कौतुक केले. (Top 10 News)
४ ) शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केलाय. नीट परीक्षा अनियमितता आणि त्यानंतर उभ्या राहिलेल्या देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राजीनाम्यानंतर प्रसिद्ध केलेल्या पत्रात प्रधान यांनी, “मी माझ्या जबाबदारीपासून कधीही पळ काढला नाही. मात्र विद्यार्थ्यांचे भविष्य राजकीय संघर्षात अडकू नये, यासाठी पदत्याग करण्याचा निर्णय घेतला,” असे म्हटले आहे. त्यांनी नीट-यूजी फेरपरीक्षा, सीबीआय चौकशी आणि पुढील वर्षापासून CBT पद्धतीने परीक्षा घेण्याच्या निर्णयाचाही उल्लेख केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे देशातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थी आंदोलनासाठी हा मोठा टप्पा मानला जातोय. (Top 10 News)
५ ) विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; CJPची घोषणा, सरकारसोबतच्या चर्चेनंतर निर्णय
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेले CJPचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेय. CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी सरकारसोबत तीन प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्याचे सांगत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केलीय. या घोषणावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून सरकारवर दबाव वाढला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी कशी होते, याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेय. (Top 10 News)
६ ) जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला
अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील अरामकोशी संबंधित तेल सुविधांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. जिजान, यानबू आणि दमाद परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या हल्ल्यामागे येमेनमधील हूती बंडखोरांचा हात असल्याचा दावा केला जात आहे. हल्ल्यानंतर यानबू प्रांतात आपत्कालीन अलर्ट जारी करण्यात आलाय. अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असल्याने या घटनेमुळे जागतिक तेलपुरवठा आणि इंधनाच्या किमतींबाबत चिंता वाढलीय. दरम्यान, हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, तर लाल समुद्रातील व्यापारमार्गाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. (Top 10 News)
७ ) आयफोन 18 प्रो लाँच होण्यापूर्वीच आयफोन 17 प्रो झाला स्वस्त
Apple चा iPhone 18 Pro लाँच होण्यापूर्वीच iPhone 17 Pro स्वस्त झालाय. या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर ग्राहकांना एकूण 9 हजार 410 पर्यंतची सूट मिळत आहे. लाँचवेळी 1 लाख 34 हजार 900 किंमत असलेला हा फोन सध्या 1 लाख 29 हजार 490 मध्ये उपलब्ध असून, त्यावर 5 हजार 410 ची थेट सूट देण्यात आलीय. याशिवाय ICICI, SBI आणि Axis Bank क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर अतिरिक्त 4 हजार ची सूट मिळू शकते. फोनमध्ये A19 Pro चिपसेट, 6.3-इंच 120Hz OLED ProMotion डिस्प्ले, 48MP ट्रिपल रियर कॅमेरा, 8x ऑप्टिकल झूम, 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि Ceramic Shield 2 संरक्षण अशी प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आलीत. (Top 10 News)
८ ) किआची धमाकेदार इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; किंमत फक्त 13.49 लाखांपासून
किआ इंडियाने भारतीय बाजारात आपली नवीन Kia Syros EV इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च केली असून तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹13.49 लाख ठेवण्यात आलीय. या इलेक्ट्रिक कारमध्ये 42kWh आणि 51.4kWh असे दोन बॅटरी पर्याय देण्यात आले असून, एका चार्जमध्ये अनुक्रमे 443 किमी आणि 526 किमी पर्यंतची रेंज मिळते. 100kW डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने मोठी बॅटरी अवघ्या 39 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. 30-इंच ट्रिनिटी डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस Android Auto-Apple CarPlay, Level-2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी अशी अनेक प्रीमियम फीचर्स या एसयूव्हीमध्ये देण्यात आली असून, डिलिव्हरी 30 जुलैपासून सुरू होणार आहे. (Top 10 News)
९ ) सूरज चव्हाणच्या घरी लवकरच गुडन्यूज; पत्नी संजनाच्या मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
‘बिग बॉस मराठी’ विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण लवकरच आई-बाबा होणार आहेत. संजनाने नुकतेच पारंपरिक अंदाजातील मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले असून ते चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. निळ्या काठपदराच्या साडीत, पारंपरिक दागिने, नथ, झुमके आणि आकर्षक मेहंदीसह संजनाचा लूक विशेष चर्चेत आहे. चेहऱ्यावरील आनंद आणि आई होण्याचा भाव प्रत्येक छायाचित्रात स्पष्ट दिसत असल्याने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. फोटो शेअर होताच सोशल मीडियावर त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी या जोडप्याच्या आयुष्यातील नव्या पर्वासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. (Top 10 News)
१ ० ) ई-रिक्षाचालक ते राष्ट्रकुलचा चॅम्पियन; झंडु कुमारने पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये पटकावलं कांस्यपदक!
ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. बिहारच्या झंडु कुमारने पॅरा-पॉवरलिफ्टिंगच्या पुरुषांच्या हेवीवेट गटात १९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर त्याचे विशेष कौतुक केलेय. वयाच्या ५ व्या वर्षी पोलिओग्रस्त झालेल्या झंडूचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आर्थिक विवंचनेमुळे भाजी विक्री आणि ई-रिक्षा चालवणाऱ्या झंडूने राष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यासाठी स्वतःची रिक्षाही विकली होती. अखेर ‘साई’च्या मार्गदर्शनाखाली त्याने राष्ट्रकुलच्या मंचावर देशाचा तिरंगा फडकवला. (Top 10 News)





