Todays Top 10 News: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष, 12 पैकी 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर समाधान व्यक्त केलेय. निकालांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला असून १२ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालेय. भाजपने २०१७ चा स्वतःचाच विक्रम मोडीत काढत २३६ जागांवर विजय मिळवलाय, तर पंचायत समित्यांमध्येही महायुतीने १०० चा टप्पा पार केला. विजयाचा आनंद साजरा करतानाच फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांची भावूक आठवण काढली. अजितदादांच्या निधनामुळे आपण स्वतः प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला होता, तरीही ग्रामीण महाराष्ट्राने महायुतीच्या कामाची पावती दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू होती. सविस्तर वृत्त वाचा – ZP Election Result : जिल्हा परिषदेच्या निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यास त्रास, प्रकृती स्थिर sharad pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेय. सततची दगदग आणि छातीत कफ झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, परिणामी खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धक्क्यातून सावरत असतानाच वाढत्या शारीरिक कष्टांमुळे त्यांची प्रकृती खालावली. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन करत प्रकृतीबाबत चिंता करून नये, असे सांगितलेय. सविस्तर वृत्त वाचा – शरद पवारांना तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं? महत्वाची माहिती समोर पंतप्रधानांविरोधात बॅनरबाजी; कर्नाटक भाजप आक्रमक, काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी Tejasvi Surya कर्नाटक विधानसभेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह बॅनर लावल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावून केंद्र सरकार आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केलाय. याप्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या बॅनरच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचे निवेदनात म्हटलेय. दुसरीकडे, राज्यातील मेट्रो दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या खासदार तेजस्वी सूर्या आणि आमदार सी. के. राममूर्ती यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने भाजपने संताप व्यक्त केलाय. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी या कारवाईचा निषेध करताना काँग्रेस सरकारवर ‘हुकूमशाही’ची टीका केली. जनतेच्या हितासाठी आवाज उठवणे हा गुन्हा ठरवला जात असून, हे लोकशाहीचे दमन असल्याचे त्यांनी म्हटले. या दोन्ही प्रकरणांमुळे कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. PFचे पैसे आता UPI द्वारे काढता येणार; मार्चअखेर नवे ॲप लाँच करणार ईपीएफओ आपल्या कोट्यवधी सभासदांसाठी लवकरच एक अत्याधुनिक मोबाइल ॲप लाँच करणार असून, याद्वारे पीएफची रक्कम थेट यूपीआय (UPI) द्वारे काढणे शक्य होणार आहे. केंद्र सरकार मार्च अखेरपर्यंत हे ॲप कार्यान्वित करण्याची शक्यता असून यामुळे ३० कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळेल. हे नवीन ॲप सध्याच्या ‘उमंग’ ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि अधिक वेगवान असेल. हे ॲप थेट सभासदाच्या बँक खात्याशी आणि भीम (BHIM) सह इतर यूपीआय ॲप्सशी जोडले जाणार असल्याने व्यवहारांमध्ये सुलभता येईल. या नव्या प्रणालीमुळे पीएफ काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी होणार असून कर्मचारी त्यांच्या एकूण बॅलन्सपैकी ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम थेट बँक खात्यात वळवू शकतील. उर्वरित २५ टक्के रक्कम खात्यात ठेवणे अनिवार्य असेल, जी नोकरी सुटल्याच्या १२ महिन्यांनंतर काढता येईल. होंडा कार्सवर 2 लाखांपर्यंतची बंपर सवलत; सिटी, अॅमेझ आणि एलिव्हेटवर मोठी ऑफर honda cars होंडा कार्स इंडियाने फेब्रुवारी २०२६ साठी आपल्या प्रमुख मॉडेल्सवर तब्बल १ लाख ९७ हजार रुपयांपर्यंतच्या सवलती जाहीर करून ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. यामध्ये सर्वाधिक १ लाख ९७ हजार रुपयांचा फायदा ‘सिटी ई: एचईव्ही’ या हायब्रिड मॉडेलवर मिळतोय. मध्यम आकाराच्या ‘एलिव्हेट’ एसयुव्हीवर १ लाख ४८ हजार रुपये, तर लोकप्रिय ‘सिटी’ सेडानवर १ लाख २७ हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. तसेच ‘अॅमेझ’ खरेदी करणाऱ्यांना माॅडेलनुसार ५७ ते ६८ हजार रुपयांपर्यंत बचत करता येईल. या ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश असून, शहर आणि स्टॉकनुसार यात बदल होऊ शकतो. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधावा असे आवाहन कंपनीने केलेय. 2026 मध्ये कागदी चलन संपणार? बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने जगात खळबळ बल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी २०२६ सालासाठी केलेली एक भीतीदायक भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतेय. त्यांच्या दाव्यानुसार, या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होऊन कागदी नोटा आणि डॉलरचे अस्तित्व संपुष्टात येईल. या भविष्यवाणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, डिजिटल चलन आणि सोन्या-तांब्याच्या युगाला सुरुवात होईल असे संकेत मिळत आहेत. सध्या विविध देशांच्या मध्यवर्ती बँका ज्या प्रकारे स्वतःचे डिजिटल चलन आणत आहेत, ते पाहता बाबा वेंगांचे शब्द खरे ठरत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगलीय. विशेषतः तांबे आणि सोने या धातूंना उद्योगात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल, असा दावा या भविष्यवाणीत करण्यात आलाय. तर्कवादी जरी याला केवळ एक योगायोग मानत असले, तरी आर्थिक बाजारातील अस्थिरतेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार 17 हजार रुपये; पोस्टाची जबरदस्त योजना post office scheme महागाईच्या काळात निवृत्तीनंतर सुरक्षित उत्पन्नाचा स्रोत शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची ‘सीनिअर सिटीझन सेविंग स्कीम’ (SCSS) वरदान ठरतेय. केंद्र सरकारच्या हमीमुळे पूर्णपणे जोखीममुक्त असलेल्या या योजनेत सध्या ८.२ टक्के इतका आकर्षक व्याजदर दिला जात असून, तो अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. या योजनेत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा असून, एकदा गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत व्याजाचा दर स्थिर राहतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत २५ लाख रुपये गुंतवले, तर ८.२ टक्के व्याजानुसार त्याला वार्षिक २ लाख ५ हजार रुपये उत्पन्न मिळते. या हिशोबाने दर तीन महिन्याला ५१,२५० रुपये आणि मासिक अंदाजे १७,०८३ रुपये खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते. ६० वर्षे पूर्ण झालेले नागरिक किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ५५ वर्षांवरील कर्मचारी यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असून तो पुढे ३ वर्षांसाठी वाढवता येतो. विशेष म्हणजे, यात गुंतवणूक केल्यास कलम ८०सी अंतर्गत दीड लाखांपर्यंत कर सवलतही मिळते. सविस्तर वृत्त वाचा – Senior Citizen Savings Scheme: पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! दरमहा 17,000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सविस्तर 10 वर्षात चंद्रावर मानवी वस्ती उभारणार; एलन मस्क यांची मोठी घोषणा स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी अंतराळ मोहिमेबाबत एक मोठी घोषणा करत आपल्या नियोजित आराखड्यात बदल केलाय. आता मंगळ ग्रहापूर्वी चंद्रावर आत्मनिर्भर शहर वसवण्यावर त्यांनी भर दिला असून, यासाठी दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीची डेडलाइन निश्चित केलीये. पृथ्वीपासून जवळ असल्यामुळे चंद्रावर मानवी वस्ती उभारणे अधिक सोपे आणि जलद होईल, असा विश्वास मस्क यांनी व्यक्त केलाय. या मोहिमेसाठी ‘स्टारशिप’ रॉकेटचा वापर केला जाणार असून, मार्च २०२७ पर्यंत चंद्रावर पहिले मानवरहित यान उतरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेय. चंद्रावरील बर्फाचा वापर इंधन आणि ऑक्सिजन निर्मितीसाठी केला जाईल, ज्यामुळे हे शहर स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकेल. मंगळ मोहिमेला अद्याप २० वर्षांहून अधिक काळ लागू शकतो, त्यामुळे तूर्तास चंद्रावर ‘सेल्फ-सस्टेनिंग’ बेस तयार करून मानवतेला बहु-ग्रहीय प्रजाती बनवण्याच्या दिशेने मस्क यांनी पाऊल टाकलेय. ‘मला सपोर्ट करा, सासरचे लोक पत्नीला पाठवत नाहीत’; अमिताभ बच्चन यांच्या हातातील पोस्टरने वेधले लक्ष amitabh bacchan, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा एक आगळावेगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दर रविवारी आपल्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर चाहत्यांना अभिवादन करणाऱ्या बिग बींच्या हातात यावेळी एक विचित्र पोस्टर दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या पोस्टरवर “मला सपोर्ट करा! माझे सासरचे लोक माझ्या पत्नीला पाठवत नाहीत. १९८२ अ लव्ह मॅरेज,” असा मजकूर लिहिलेला होता. मात्र, या पोस्टरचा अमिताभ यांच्या वैयक्तिक आयुष्याशी कोणताही संबंध नसून, ही एका आगामी चित्रपटाची अनोखी जाहिरात असल्याचे स्पष्ट झाले. ‘१९८२ अ लव्ह मॅरेज’ हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून, त्याच्या प्रमोशनसाठी बिग बींनी हे पोस्टर हातात धरले होते. भारत-पाक सामन्यासाठी पाकची ‘सौदेबाजी’; आयसीसीसमोर ठेवल्या 3 अजब अटी टी-२० वर्ल्ड कप २०२६मध्ये १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने आता नमते घेत चर्चेची तयारी दर्शवलीय. मात्र, यासाठी पीसीबीने आयसीसीसमोर तीन अजब अटी ठेवल्या आहेत, ज्याने क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त होतेय. पीसीबीने आयसीसीच्या वार्षिक महसुलात आपला वाटा वाढवण्याची मागणी केली आहे. भारताने नकार देऊनही द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी आयसीसीने हस्तक्षेप करावा, अशी पाकिस्तानची दुसारी मागणी आहे. तसेच तीसरी अट मैदानावर भारतीय खेळाडूंनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करणे सक्तीचे करावे, असा अजब आग्रह पीसीबीने धरलाय. लाहोरमध्ये आयसीसीचे डेप्युटी चेअरमन इमरान ख्वाजा आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नकवी यांच्यात ५ तास चर्चा झाली. आयसीसीने अद्याप यावर अधिकृत भूमिका घेतलेली नाही, मात्र पाकिस्तानने माघार न घेतल्यास त्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते. सविस्तर वृत्त वाचा – पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यासाठी ICC समोर ठेवल्या ३ अजब अटी; ५ तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय घडलं?