3 Indian sailors Death : अमेरिकेच्या लष्करी कारवाईत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताने अमेरिकेला ठणकावले
3 Indian sailors Death : गेल्या चार दिवसांत ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय कर्मचारी असलेली तीन व्यापारी जहाजे अमेरिकेच्या लष्करी कारवाईच्या कचाट्यात आली, अशी माहिती भारताने गुरुवारी जाहीर केली.

3 Indian sailors Death : ओमानच्या समुद्रात अमेरिकन लष्कराने केलेल्या कारवाईत भारतीय खलाशी असलेल्या तीन विदेशी व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनांमध्ये ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे.
भारताने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, नवी दिल्लीतील अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सागरी मार्गावरील जहाजांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे.
गेल्या चार दिवसांत ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय कर्मचारी असलेली तीन व्यापारी जहाजे अमेरिकेच्या लष्करी कारवाईच्या कचाट्यात आली, अशी माहिती भारताने गुरुवारी जाहीर केली. भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवर अमेरिकन नौदलाने कारवाई केल्याची आणि त्यात भारतीयांचा मृत्यू झाल्याची कबुली भारताने जाहीरपणे देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तीन जहाजांवर कारवाई; नेमके काय घडले?
८ जून (एमटी मॅरिव्हेक्स): पलाऊ देशाचा ध्वज असलेल्या ‘मॅरिव्हेक्स’ या तेल टँकरवर अमेरिकन सैन्याने पहिली कारवाई केली. या जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. कारवाईनंतर हे जहाज बंद पडले, मात्र सुदैवाने यावरील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाचवण्यात आले.
१० जून (एमटी सेट्टेबेलो): पलाऊचाच ध्वज असलेल्या ‘सेट्टेबेलो’ या दुसऱ्या टँकरवर अमेरिकेने हल्ला केला. या जहाजावरील २४ भारतीय खलाशांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला.
११ जून (एमटी जलवीर): गिनी-बिसाऊचा ध्वज असलेल्या ‘एमटी जलवीर’ या जहाजावर अमेरिकेने दोन हेलफायर क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे हे जहाज निकामी करण्यात आल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “भारतासाठी आपल्या नागरिकांची आणि सागरी समुदायाची सुरक्षा सर्वोच्च आहे. असे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. कोणताही वाद संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवला पाहिजे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची ये-जा विनाअडथळा झाली पाहिजे, असे भारताने अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे.” दरम्यान, ही तिन्ही जहाजे परदेशी ध्वजांची असून ती भारतीय मालकीची नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘जलवीर’वरील खलाशांची सुटका; मृतांच्या कुटुंबांना मदत –
शिपिंग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी माहिती दिली की, बाधित जहाजांवरील खलाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ‘सेट्टेबेलो’ जहाजावरील उर्वरित २५ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, यामध्ये २१ भारतीय, २ पाकिस्तानी, १ रशियन आणि १ युक्रेनियन नागरिकाचा समावेश आहे. या घटनेत जीव गमावलेल्या भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांना ‘सीमन वेल्फेअर फंड सोसायटी’तर्फे प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सध्या खाडी क्षेत्रात १८ हजारांहून अधिक भारतीय खलाशी कार्यरत आहेत, ज्यांच्या सुरक्षेवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे.
अमेरिकेचा दावा: इराणवरील निर्बंधांचे उल्लंघन –
दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) या कारवाईचे समर्थन केले आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार, ही जहाजे इराणमधून बेकायदेशीरपणे तेल वाहून नेत होती आणि इराणवर लादलेल्या सागरी नाकेबंदीचे उल्लंघन करत होती.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा ‘एमटी जलवीर’च्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकन दलाच्या इशाऱ्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले, तेव्हा एका अमेरिकन विमानाने जहाजाच्या इंजिन रूमला लक्ष्य करत दोन क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेने १३ एप्रिलपासून सुरू केलेल्या या नाकेबंदीत आतापर्यंत आदेश न मानणारी ९ जहाजे निकामी केली आहेत, तर १३५ जहाजांना मार्ग बदलण्यास भाग पाडले आहे.





