शिरूर – पर्यटन, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या शिरूर- पाबळ रस्त्यावरील (रामा–१०३) धनगरवस्ती–कुरंदळे वस्ती जवळील धोकादायक वळणावर काटेरी झाडे अखेर यशस्वीपणे हटवण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संयुक्त कार्यवाही यशस्वी केली. शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी स्वतः उपस्थित राहून ही कार्यवाही केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भानुदास थोरात व वनरक्षक गणेश झिरपे यांनी प्रत्यक्ष काम पार पाडले. सहाय्यक अभियंता अनिल जाधव व कनिष्ठ अभियंता बाबासाहेब गाडेकर यांनी वनविभागासोबत समन्वय साधत कार्यवाही पूर्ण केली. याशिवाय, काटेरी झुडपांच्या जवळ उच्चदाब विद्युत वाहिनी असल्याने महावितरणचे वैभव बारवकर व कर्मचारी गणेश दिघे यांनी विद्युत अपघात टाळण्यासाठी तत्परतेने काम केले. या एकत्रित प्रयत्नांमुळे नागरिकांना सुरक्षित प्रवासासाठी मोठा दिलासा मिळाला असून, यापूर्वी या वळणावर अनेक अपघात होऊन अनेक जण मृत्यूमुखी व गंभीर जखमी झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले की, “अशा इतर ठिकाणीही अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने स्वप्रेरणेने पुढाकार घेतला पाहिजे,तसेच शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवण्याची आणि याठिकानाचे चढ कमी करणे इत्यादी मागणी अद्याप प्रलंबित आहे.” यावेळी ग्राहक पंचायतीचे शिरूर तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, प्रगत शेतकरी बापू खिराजी कुरंदळे, प्रदीप दसगुडे व इतर नागरिक उपस्थित होते. “या धोकादायक वळणावर काटेरी झुडपांमुळे अनेक अपघात होत होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक दिवस सातत्याने पाठपुरावा केला. वन. प.क्षे.अ. नीलकंठ गव्हाणे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आणि अखेर वनविभाग व सा.बां.विभागाने समन्वय साधत कार्यवाही पूर्ण केली. ही जनहितासाठी दिलासा देणारी बाब आहे. यापुढे प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी स्वप्रेरणेने कामे करावीत. तसेच संबंधित ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवण्याची मागणी अद्याप प्रलंबित असून त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.” – निलेश मंदा यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता/व्हिसल ब्लोअर) “शिरूर–राजगुरुनगर रस्त्यावरील धोकादायक वळणावर काही झाडांमुळे दृश्यमानता कमी होती आणि यामुळे पूर्वी अपघात झाले होते. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या मागणीवरून वन विभाग व PWD विभागाच्या संयुक्त सहकार्याने झाडे काढून टाकली गेली, जेणेकरून अपघाताचा धोका कमी होईल.” – निळकंठ गव्हाणे (वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर/घोडनदी)