वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

पुणे (ता. राजगड) : कामथडी ते पाबे (ता. राजगड, जि. पुणे) या सुमारे ४० किलोमीटर लांब ३३ केव्ही वीजवाहिनीच्या तारा शुक्रवारी (दि. २३) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास तुटल्या. परिणामी वेल्हा तालुक्यातील पाबे, वाजेघर, पाल, विंझर आदी ४१ गावांतील सुमारे ६ हजार घरगुती, व्यावसायिक आणि शेतीपंपधारक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र भर पावसात महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी जंगलातील चिखल, खाचरे आणि वन्यजीवांचा धोका पत्करून रात्रभर काम करत शनिवारी (दि. २४) सकाळी वीजपुरवठा सुरळीत केला.
या परिसरात महावितरणच्या नसरापूर उपविभागाच्या अंतर्गत असलेल्या पाबे ३३ केव्ही वीजवाहिनीच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. या वीजवाहिनीला झालेल्या मोठ्या बिघाडामुळे अंधारात गेलेल्या गावांमध्ये तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंते आणि तंत्रज्ञ यांनी धाडसी पाऊल उचलले.
चिखलातून काढली वाट
विजेच्या तारा तुटल्या होत्या त्या कामथडीजवळील दाट जंगलातील ठिकाणी पोहोचणे फारच धोकादायक होते. मुसळधार पावसामुळे चिखल झालेला होता, भातशेतीच्या खाचरातून वाट काढणे अत्यंत कठीण होते. तरीही उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटूळे व कनिष्ठ अभियंता सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली समीर मुजावर, सूर्यकांत शिंदे, गणेश शिंदे, राहुल भुरूक, रवी कातुरडे, नीलेश शेंडकर, गणेश गायके, अमोल डांगे, चेतन चोरगे आणि अमोल रणभोरे या १० तंत्रज्ञांनी रात्रभर अंधारात, जंगलात, चिखलात वीजतारा जोडण्याचे काम सुरू ठेवले.
कोल्हे हल्ला करणार इतक्यात…
मोबाईल व बॅटरीच्या उजेडात काम करत असताना कोल्हे व रानडुक्करांचा वावर सतत जाणवत होता. एक प्रसंग तर थरारक ठरला, जेव्हा प्रधान तंत्रज्ञ समीर मुजावर यांच्यावर दोन कोल्हे हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र इतर कर्मचाऱ्यांनी वेळेवर आरडाओरड करून, प्रकाशझोत टाकून कोल्ह्यांना पळवले.
‘प्रकाशदूत’ म्हणून गौरव
या चमकदार कामगिरीमुळे रात्रीच ९० टक्के दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. सकाळी उर्वरित किरकोळ दुरुस्ती करून पाबे ३३ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. परिणामी, सर्व ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत सुरळीत झाला. या धाडसी कार्यवाहीबद्दल पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांचे ‘प्रकाशदूत’ म्हणून गौरव करत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.





