“काँग्रेसचं काम म्हणजे… बारश्याला गेला आणि बाराव्याला आला”; PM मोदींचा वर्ध्यातून विरोधकांवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 | PM Modi – काँग्रेसची भूमिका ही कायमच विकासविरोधी राहिलेली आहे. बारश्याला गेला आणि बाराव्याला आला, अशा विचाराने काम करणारे काँग्रेसी लोक होते. कुटुंबांच्या नावावर दगड लावले जात होते. मात्र, काम मात्र कधीच झाले नाही. विदर्भाला काँग्रेसच्या धोरणामुळे विकासापासून दूर ठेवले गेले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
ते विदर्भातील वर्धा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करत होते. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा व वर्धा लोकसभेचे भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. यावेळी व्यासपिठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती.
मोदी पुढे म्हणाले, विरोधकांकडे विरोध करायला मुद्दाच राहीला नाही. त्यामुळे ते शिवीगाळीचे व देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहे. एनडीएने गेल्या दहा वर्षात केलेल्या देशातील विकासामुळे विरोधकांचे तोंड बंद झाले आहेत.
आता तर कॉंग्रेसचे युवराज देशात आग लावण्याचे काम करत आहे. संविधान तोडण्याचा अपप्रचार केला जात आहे, असा हल्लाबोलही पंतप्रधानांनी राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केला.
2024ची लोकसभा निवडणूक ही आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीची आहे, विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवणारी ही निवडणूक आहे, यात वर्धा व अमरावती लोकसभेतील लोकांचा आम्हाला आशीर्वादाची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
‘इंडिया’ला मत देणे बर्बाद
इंडिया आघाडीच्या लोकांना मतदान करणे म्हणजे तुमचे मत बर्बाद करणे आहे. महाराष्ट्रातील लोकांनी व देशातील जनतेने ठरवून टाकले आहे की, विकासाला मतदान करायचे आहे. देशातील सर्व विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी फिर एक बार चारसो पार असा नारा यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिला.





