शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डींगची प्रतिक्षा संपली; हैदराबादहून आलेल्या विमानाचं स्वागत

बाळासाहेब सोनवणे / शिर्डी : राज्यात कमी कालावधीत सर्वाधिक वेगवान ठरलेल्या श्री साईबाबा शिर्डी विमानतळावर आठ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नाईट लॅण्डींगची सुविधा रविवार दि.३० मार्चपासून सुरुवात झाली आहे. रात्री ९ वाजता इंडिगो एअर लाईनचे पहिले ८० आसनी विमान हैद्राबादवरुन ६८ प्रवाशांना घेऊन शिर्डी विमानतळावर यशस्वीरित्या लैंडिंग झाले. यावेळी विमानातील प्रवाशांचे शिडर्डी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने स्वागत करण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कृष्णा पॉल यांनी दिली.
शिर्डी येथील श्री साईबाबा विमानतळावर आठ वर्षापासून प्रतिक्षेत असलेली येथील नाईट लॅण्डींग सुविधा सुरू होत असल्याने साईभक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. काही महिन्यापूर्वीच नागरी उड्डाण महानिर्देशालय ( डी.जी.सी.ए) ने परवाना बहाल करून या सुविधेस हिरवा कंदिल दाखविला. विमानतळ उभारणी आणि संचलनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने हे विमानतळ उभारले असून टर्मिनल बिल्डींगपासून ते कन्व्हेअर बेल्टपर्यतच्या मर्यादित सुविधा आणि नाईट लॅण्डींग सुविधेचा अभावामुळे संधी असूनही या विमानतळाचा विस्तार खोळंबला होता.
व्हिजीबीलीटी (दृष्यमानता) कमी झाली की हिवाळा आणि पावसाळ्यात येथे येणारी विमाने बहुतांशी मुंबई विमानतळावर उतरवावी लागत होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. नाईट लॅण्डोंग सुविधेमुळे तुलनेत कमी प्रकाशमानता असली तरी विमान फेऱ्यांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे ही सुविधा कधी सुरू होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही सुविधा सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून नाईट लॅण्डींग सुविधेला परवाना मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे म्हटले. भौगोलिक दृष्ट्या हे विमानतळ उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक आणि देशभरातील महानगरात कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांसाठी महत्वाचे आहे.
नाईट लॅण्डींग सुविधे अभावी त्यांच्या विस्ताराला खीळ बसली होती. अखेर त्यास परवानगी मिळाल्यानंतर हैद्राबादवरुन आलेल्या ८० आसनी इंडीगो एअरलाइन्सचे पहिलेच विमान प्रवाशांना घेऊन या विमानतळावर यशस्वीरित्या लैंड झाले असून हेच विमान पुन्हा रात्री ९ वाजून ५ ० मिनिटांनी शिर्डीहून हैद्राबादच्या दिशेने झेपावणार असल्याचे एपीडी पॉल यांनी सांगितले, त्याबरोबरच या विमानतळाच्या विस्ताराचे आणि परिसराच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले होणार असून विविध महानगरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्येतही कमालीची वाढ होईल.





