Aditya Thackeray : ‘सत्ताधारी पक्षाला माज आलाय’; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन आदित्य ठाकरेंचा संताप

मुंबई : रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत, त्यापेक्षा त्या महिला आहेत हे महत्वाचं. खासदार सुप्रिया सुळेंना आर्वाच्च भाषेत बोलणाऱ्यांना याआधीच्या सरकारमध्ये मंत्री केलं. मधली अडीच वर्षे सोडली तर राज्यात गेल्या 10 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे. तसेच, पोलिसांचे हात बांधले आहेत, कोणी आपल्यात येत आहे का त्यासाठी गुन्हेगारांना सूट दिली आहे, त्याचे हे परिणाम आहेत, असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यावरुन, राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी एकाला ताब्यातही घेतलं आहे. त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.
सत्ताधारी पक्षाला माज आलाय : आदित्य ठाकरे
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, आमच्यात जागेवरून वाद नाही, हे जनतेचे प्रश्न आहेत. कारवाई सत्तेत नसलेल्यांवर होते तशी सत्तेत असलेल्यांवर का होतं नाही? ईव्हीएमवर तुम्ही निवडून आलात, वचनपूर्ती करणार का? लाडक्या बहिणीचे पैसे वाढवणार की नाही, असे अनेक सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. शक्ती कायदा राष्ट्रपतींनी परत पाठवला, सत्ताधारी पक्षाला माज आला आहे. पदं येत जात असतात, उद्या त्याचाही विरोधी पक्षावरुन वाद होईल, पालकमंत्री पदावरून, मालकमंत्री कोण होणार, बंगल्यावरुन वाद सुरू आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणे हे चुकीचे : देवेंद्र फडणवीस
या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहीना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अशा व्यक्तींना चिरडून काढले पाहिजे : रुपाली चाकणकर
ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत, यांचे चेहरे आता समोर आणले पाहिजे. राज्य महिला आयोगाला फार मोठी गरिमा आहे. कोण काय बोलत असेल, तर तो प्रश्न तुम्हीच त्यांना विचारा. अशा बाप असलेल्या व्यक्तींना चिरडून काढले पाहिजे पण आपण न्यायाच्या चौकटीत आहोत. कायद्यामुळे हात बांधले जातात अन्यथा आम्ही कडक कारवाई केली असती, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.




