पाच जवान शहीद झाल्यानंतर लष्कराकडून दहशतवाद्यांचा पाठलाग; चकमक अद्याप सुरु

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईदरम्यान लष्कर अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले आहेत. चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाल्यानंतर चार दिवसांनी जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे.
पूंछ-राजौरीच्या जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या ऑपरेशनमुळे जम्मू-पूंछ-राजौरी हायवे बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे ज्यांनी १० ऑक्टोबरला सुरक्षा जवानांवर गोळीबार केला होता. या चकमकीत एक अधिकारी आणि चार जवान शहीद झाले होते.
दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात एक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले आहेत. ऑपरेशन अद्यापही सुरु आहे अशी माहिती लष्कर प्रवक्त्याने दिली आहे.
लष्कर गेल्या चार दिवसांपासून या दहशतवाद्यांचा पाठलाग करत होते. मात्र उंच डोंगर आणि जंगलामुळे ते जवानांना चकमा देत होते. पण अखेर गुरुवारी जवान आणि दहशवतादी आमने-सामने आले. दरम्यान, अजूनही दहशवादी आणि जवान यांच्यात अद्यापही चकमक सुरु आहे.




