औरंगाबाद – हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी अधिवेशनात सत्तारांना लक्ष्य केले. अशात पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरशेतकऱ्यांची जमिन हडपल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर नवीन वर्षात पुन्हा आरोप झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वाशीम जिल्ह्यातील गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवासाठी 15 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सत्तारांवर सातत्याने आरोपांची राळ उठवली गेली. यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी सत्तारांवर सिल्लोडमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दाखल केली आहे.
शंकरपेल्ली यांनी स्वत:सह पाच शेतकऱ्यांची एकत्रित तक्रार सीबीआयकडे दिली आहे. आशाबाई बोराडे, मुक्तार बागवान, शफीक खा पठाण, कृष्णा कडुबा कापसे, तय्यब बडेमिया खा पठाण अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत सत्तार यांच्या मालमत्तेचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तक्रारदार महेश शंकरपेल्ली म्हणाले, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सत्तारांवर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात सत्तारांविरोधात आजपर्यंत झालेल्या तक्रारींचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच सत्तारांनी या जमिनी कशाप्रकारे बळकावल्या याचे पुरावेही सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले.
मागील वर्षी 784 पानांचे पुरावे व 22 मुद्दे सादर करत सत्तारांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. तर यावर्षी 559 पानांचे अतिरिक्त पुरावे आणि 28 मुद्दे उपस्थित करुन पुन्हा ईडी कार्यालयात चौकशीची मागणी केली, असेही शंकरपेल्ली म्हणाले.
दरम्यान, नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. यावेळी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.