खरिपामध्ये तोटा, रब्बीची आशा धूसर

इंदापूर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात; महागाईचीही शक्यता
कळस (वार्ताहर) – अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके गेली आहेत. अद्याप सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना रब्बीची तयारी करता येत नाही, अशा दुहेरी संकटात इंदापूर तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. कांदा, सोयाबीन, मका पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. जादा पावसामुळे रबी हंगामात तण आणि रोगराईचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या भयाण दुष्काळानंतर पाऊसही उशिरा आला. त्यामुळे खरीप हंगामाला उशीर झाला. आता खरिपातील पिके काढणीला आली असतानाच वादळी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. इंदापूर तालुक्यातील सुमारे हजारो हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.यामध्ये मका, बाजरी, कापूस, ऊस, भाजीपाला, कडवळ, कांदा, केळी, भुईमुग, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, फळबागांचा समावेश आहे. मधल्या क्ाळात कांद्याची भाववाढ झाली होती. त्यामुळे नवा कांदा येण्याची प्रतीक्षा होती. मात्र, नवा कांदा काढणीचे काम सुरू असतानाच पाऊस झाल्याने कांदा शेतातच सडला. त्यामुळे कांद्याची कमतरता कायम राहून भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. इतर पिकांच्या बाबतीतही असेच होणार आहे. दिवाळीनंतर थंडी सुरू होताच रब्बीची तयारी सुरू होते.
या काळात गहू, हरभरा, ज्वारीची पोरणी केली जाते. मात्र, पावसामुळे शेतात वापसा झाला नाही. नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी पडलेली नाही. रब्बीसाठी तयार करून ठेवलेल्या रानात पावसामुळे तण वाढले आहे. त्यामुळे वापसा मिळाल्यानंतर मशागतीचे काम पुन्हा सुरूवातीपासून करावे लागणार असल्याने खर्च वाढणार आहे. मुळात शेतात पाणी साचल्याने जमीन पेरणीयोग्य होण्यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. ज्यांच्या शेतात खरिपाची पिके नव्हती, त्यांनाही अशा पद्धतीने पावसाचा फटका बसला आहे.
तण, रोगराईने डोके वर काढले
जादा पावसामुळे बऱ्याच प्रकारचे तण आणि किडींनी डोके वर काढले आहे. जादा पावसानंतर उगवणाऱ्या वनस्पती शेतात उगवल्या आहेत. काळ्या, लाल गोगलगाईसह अन्य किटकही आढळून येत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची निवासस्थाने नष्ट झाल्याने त्यांचा शेतात आणि मानवीवस्तीत वावर वाढला आहे. मशागतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने तणनाशक वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्याच्या किमतीसोबतच त्याच्यापासून होणाऱ्या धोक्यांचाही शेतकऱ्यांना सामना करावा लागणार आहे. भाज्या आणि फळांचा भाव आतापासूनच वाढण्यास सुरवात झाली आहे. सध्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. ते काम झाल्यानंतर वापसा पाहून शेतकऱ्यांना ही पिके काढून पुढील पिकांसाठी शेत तयार करावे लागणार आहे. सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई किती आणि केव्हा मिळते, यावर ही कामे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगामावरही टांगती तलवार कायम आहे.
उत्पन्नावर परिणाम
यंदा शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. दुष्काळामुळे उन्हाळी पिके आली नाहीत. नगदी पीक मानले जाणाऱ्या उसाचेही उत्पादन यावर्षी कमी आहे. खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. आता रब्बीची आशा असली तरी त्यावरही खराब हवामान, वादळ आणि रोगराईची टांगती तलवार आहे. त्यामुळे यावर्षी एकूणच शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार असल्याने त्यांच्यापुढे मोठा आर्थिक पेच निर्माण होणार आहे.





