सरकार पद्म पुरस्कारांप्रमाणे ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ देणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने यापुढे पद्म पुरस्कारांप्रमाणेच ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ देणार असल्याचे जाहीर केले आहे. या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केवडिया येथे डीजीपी आणि आयजीपीच्या वार्षिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देणारी संस्थेची घोषणा केली. विशेष म्हणजे केवडियामध्येच सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक विशाल पुतळा आहे. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार अखंड भारताच्या मूल्यांना बळकटीकरण आणि भर देण्यात आणि ऐक्य व अखंडतेला प्रोत्साहन देणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा सन्मान देण्यात येणार आहे. जात, व्यवसाय, स्थान आणि लिंग यांच्या भेदभावाशिवाय उत्कृष्ट कार्य करणारी कोणतीही व्यक्ती या पुरस्कारास पात्र ठरेल. हा पुरस्कार मरणोत्तरही देण्यात येणार आहे. पुरस्कारांची नावे भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जातील आणि त्यासंदर्भात संबंधित रजिस्टरही राष्ट्रपतींच्या आदेशानुसार ठेवले जाईल. हा पुरस्कार कमळाच्या पानाच्या स्वरूपात असेल आणि त्यात सोने-चांदी मिसळली जाईल.




