Manikrao Kokate – अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मोबाइलवर रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या कृतीने राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर नाशिकमध्ये कृषीमंत्री कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेताना सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिले. मात्र, स्पष्टीकरण देताना, एका जुन्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवीन वक्तव्य केले आहे. यामुळे नवीन वाद उद्भवू शकतो. कोकाटे स्पष्टीकरण देताना म्हणाले की, शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते. पण शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. सरकार नुसतेच पैसे घेते. म्हणजे भिकारी कोण? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही. परंतु, माझ्या वक्तव्याचा उलटा अर्थ काढण्यात आला. एक रुपया फार मोठी किंमत नाही. परंतु, या एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज प्राप्त झाले. माझ्याच कार्यकाळात ही घटना घढली. त्यानंतर आम्ही तात्काळ ते बोगस अर्ज रद्द केले आणि काही नव्या घोषणा केल्या, असे म्हणत त्यांनी पुन्हा राज्य शासनावर टीका केली.