हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल; पहिल्या मानाच्या दोन डझन आंब्याच्या पेटीची किंमत 7700 रुपये

मुंबई – दरवर्षी हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे कोकणातील या राजाची आतुरतेने वाट पाहिली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णेमधून पहिली हापूस आंब्याची पेटी बाजारात दाखल झाली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून हा मान हर्णेच्या मयेकर कुटुंबाकडे आहे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा सगळ्यांनाच आवडतो.
यंदाच्या हंगामातील हर्णेमधील आंबा बागायतदार सागर मयेकर यांच्याकडून दोन डझनची एक पेटी असा तीन पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. पहिल्या मानाच्या दोन डझन आंब्याच्या पेटीची किंमत 7 हजार 700 रुपये इतकी झाली. म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास 321 रुपये एवढी झाली आहे. अशा तिन्ही पेट्यांची एकूण 23112 रुपये अशी किंमत मुंबई मार्केटमध्ये मिळाली. पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. दापोलीतील आंबा विक्री व्यवसायाला साधारण दोन महिने अगोदरच मुहूर्त लागला आहे.
यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणआत होईल, अशी अपेक्षा आहे. एप्रिलनंतर आब्यांची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून मार्च किंवा महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरू होईल.





