Hasan Mushrif : “अर्थखातं राष्ट्रवादी कडेच राहणार आहे”; हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत !
हसन मुश्रीफ यांनी अर्थखात्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. “अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Hasan Mushrif | Jayant patil : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा ‘अर्थखातं’ केंद्रस्थानी आलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रखडलेला अर्थखात्याचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नसतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या दाव्यामुळे महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘अर्थखातं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार’, असा ठाम दावा मुश्रीफ यांनी केला आहे.
अर्थखात्याच्या निर्णयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून, लवकर निर्णय व्हावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. (Hasan Mushrif)
त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या मागणीवर भाजप काय भूमिका घेणार आणि महायुतीतील सत्तावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. यापूर्वीही अर्थखातं राष्ट्रवादीकडे देण्याबाबत आश्वासन झाल्याची चर्चा होती; मात्र अंतिम निर्णय लांबल्याने या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या गोटात नाराजीची कुजबुज सुरू असल्याचं वृत्त समोर आलं होतं. (Hasan Mushrif)
माध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी अर्थखात्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. “अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून, या विषयावर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Hasan Mushrif)
अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास शिवसेनेकडून विरोध असल्याच्या चर्चांवरही मुश्रीफ यांनी भाष्य केलं. महायुतीमध्ये अशा प्रकारे मतभेद निर्माण करून चालणार नाहीत, असं सांगत त्यांनी युती स्थापन करताना जे ठरलं होतं, त्यानुसारच निर्णय व्हावा, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट एनडीएमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्याच्या चर्चांबाबत बोलताना मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएमध्ये चौथा पक्ष घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाला नकार दिल्याने, पुढील राजकीय समीकरणांबाबत सध्या ठोसपणे काही सांगता येणार नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं.
पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेल्या भेटीवरही हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिलं. ही भेट ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेशी संबंधित प्रकरणाबाबत झाली होती, असं त्यांनी सांगितलं. या भेटीमागे यापेक्षा वेगळं काही राजकीय कारण होतं का, याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.






