Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. आयोगाची वर्तणूक तुघलकी आयोगासारखी आहे. बंगालमधील मतदारयाद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी आयोग भाजपच्या निर्देशांवरून हालचाली करत आहे, असा आरोप त्यांनी केला. लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या बंगालमधील मतदारयाद्या पडताळणी (एसआयआर) मोहीम अंतिम टप्प्यात पोहचली आहे. एसआयआरवरून निवडणूक आयोगावरील टीकेचे सत्र ममतांनी सुरूच ठेवले. निवडणूक आयोग नियमभंग करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहे. आयोगाने निर्माण केलेल्या गोंधळामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. आयोगाने बंगालमधील मतदारांचा छळ केला. बिहारसारख्या राज्यात पडताळणीसाठी स्वीकारण्यात आलेली कागदपत्रे बंगालमध्ये नाकारण्यात आली. दोन्ही राज्ये भारताचा भाग नाहीत का, असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. जनतेचा मताधिकार हिरावण्याचा प्रयत्न झाला किंवा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला; तर मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अंतिम याद्यांमध्ये सर्व पात्र मतदारांच्या समावेशाची निश्चिती निवडणूक आयोगाने करावी. बांगलादेशात शांततेत निवडणुका झाल्या. मात्र, आपल्या देशात लोकशाही उद्धवस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत, अशी आगपाखडही त्यांनी केली.