Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली असल्याची मोठी घोषणा केली आहे. भाजपच्या भूमिकेमुळे युती तोडण्याचा निर्णय घेत असल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या अहंकारामुळेच युती तोडतोय, असा थेट प्रहार त्यांनी भाजपवर केला आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ही एक मोठी घडामोड घडली आहे. यामुळे आता या महापालिकेसाठी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र, सुरुवातीपासूनच स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत होते आणि त्यामुळे शंका निर्माण झाल्या होत्या, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरले होते. त्यामुळे त्या वेळी युती झाली, अशाच संभ्रमात आम्ही होतो. मात्र प्रत्यक्ष जागा देण्याची वेळ आली, तेव्हा शिवसेनेच्या जागाच सोडाव्यात, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली. संजय शिरसाट यांनी यावेळी बोलताना भाजपवर थेट आरोप केला की, एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेला कमी लेखणारे प्रस्ताव द्यायचे, ही दुहेरी भूमिका भाजपने घेतली, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत. आम्ही काहीही करू शकतो, असा त्यांना अहंकार होता. त्याचा अंत आज भाजप-शिवसेना युती तोडल्याने झाला, असल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले आहेत. या महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली असून, दोन्ही पक्षे स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकारण आणखी तापणार असून, राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जाऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने शिरसाट यांनी भाजपला इशारा दिला आहे. एकमेकांवर चिखलफेक होऊ नये, ही आमची भूमिका असेल. परंतु, जर आमच्यावर कुणी चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी ठणकावून सांगितले आहे. कुठे यश, तर कुठे अपयश एकीकडे मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणांची युती तुटली आहे. दोन्ही पक्षांकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणचा तिढा सोडविण्यात अपयश आले आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युतीही झाली आहे. दोन्ही बाजूंकडून जसे प्रस्ताव जागावाटपासंदर्भात येत आहे त्यावर निर्णय घेतला जात आहे. हे यावरून स्पष्ट झाले आहे. हेही वाचा : राष्ट्रपतींच्या पत्नीपासून ते बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधानापर्यंत…वाचा खालिदा झिया यांची संपूर्ण कारकिर्द