Narendra Modi : काँग्रेसच्या कपाळावरील ‘तो’ शिक्का कधीही पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली : भारत ही लोकशाहीची जननी आहे. संविधानाची 75 वर्षे हा देशासाठी संस्मरणीय प्रवास आहे. संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी हा त्याचा आधार आहे. आमच्यासाठी हा उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे. मात्र संविधानाला जेंव्हा 25 वर्षे पूर्ण होत होती तेंव्हा देशात संविधानाचे लचके तोडले जात होते.आणीबाणी लागू केली गेली. काँग्रेसच्या कपाळावरील हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही. कारण लोकशाहीची गळचेपी करण्यात आली होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभेत संविधावरील चर्चेला उत्तर दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, संविधानची अंमलबजावणी लागू होऊन 75 वर्षांचा उत्सव साजरा होत असताना आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी असणे ही चांगली भावना आहे. हे संविधानाशी सुसंगत आहे. प्रत्येक मोठ्या योजनांचे केंद्र महिला आहेत. तुम्ही आमची धोरणं पाहिली तर गेली 10 वर्षे देशातील नागरिकांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली.आम्ही देशाची एकता मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कलम 370 देशाच्या एकतेच्या आड येणारे होते. हे कलम आम्ही काढून टाकले. कारण देशाची एकता ही आमची प्राथमिकता आहे.
देश संविधानाची 50 वर्षे साजरी करत असताना मला संविधानामुळे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. त्याचवेळी मी ठरवले होते की संविधानाची 60 वर्षे साजरी करू. इतिहासात हे पहिल्यांदाच झाले की हत्तीवरील अंबारीमध्ये संविधानाला ठेवून गौरव यात्रा काढण्यात आली होती आणि मुख्यमंत्री हत्तीसोबत रस्त्यावरून पायी चालत होता.
संविधानामुळे माझ्यासारखे अनेक लोकं इथपर्यंत पोहोचू शकले, कारण आम्हाला कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. संविधान आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. संविधानामुळे आम्हाला एक-दोनवेळा नाही तर तीनवेळा संधी मिळाली. आम्ही वन नेशन वन रेशन कार्डबद्दल बोललो. देशातील गरिबांना मोफत उपचार मिळाले आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांना गरिबीशी लढण्याचे बळ मिळाले. आम्ही वन नेशन वन आयुष्मान कार्ड आणले, असेही पंतप्रधानांनी सांगितले.





