Tathawade Issues: स्मार्ट सिटीत ताथवडे गाव ‘अनाथ’? नगरसेवकच नसल्याने नागरिकांचे हाल; काय आहे खरी अडचण?
Tathawade Issues: महापालिकेत समाविष्ट होऊनही ताथवडेचे प्रश्न जैसे थे; स्थानिक लोकप्रतिनिधित्व न मिळाल्याने विकासकामे खोळंबल्याचा नागरिकांचा आरोप.

Tathawade Issues – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट होऊन अनेक वर्षे उलटूनही ताथवडे परिसरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधित्वाच्या अभावामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर २०१२ ते २०१७ या कालावधीत यमुना पवार या ताथवडेच्या एकमेव नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या.
मुळशी तालुक्यात ताथवडे गाव असताना एकेकाळी गावचा रुबाब संपूर्ण तालुक्यात अग्रस्थानी राहत होता. मात्र गेल्या दहा वर्षांत ताथवडेला महापालिकेत थेट प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, पाणीपुरवठा तसेच विविध आरक्षणे विकसित करण्याचे प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील अंडरपासमधील नियमित वाहतूक कोंडी आणि सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात गंभीर बनतो. मागील वर्षी या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात आंदोलन, सोशल मीडियावर टीका आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. पुनावळे परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र यंदाच्या परिस्थितीत चित्र काहीसे वेगळे दिसत आहे.
महापालिका निवडणुकीनंतर विरोध करणारे आणि ज्यांच्यावर टीका केली जात होती असे सर्वच लोकप्रतिनिधी एकाच पक्षातून महापालिकेत निवडून आले. पुनावळे भागाला तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व मिळाले असले तरी ताथवडे गावाला पुन्हा एकदा अपयश आले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून जैसे थे असलेल्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
ताथवडेकरांच्या समस्यांना मिळेना वाचा
ताथवडे गावाच्या स्थानिक राजकारणातील अंतर्गत मतभेदांचा फायदा वाकड भागातील नेतृत्वाला होत असल्याची चर्चा ताथवडेमध्ये सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून ताथवडेकरांना महापालिकेत स्वतःचा प्रभावी आवाज मिळत नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी, नागरिकांच्या दैनंदिन समस्या, मूलभूत सुविधा आणि विकासकामांसाठी पाठपुरावा प्रभावीपणे होत नसल्याची टीका केली जात आहे.
दरम्यान, ताथवडे परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढीच्या तुलनेत रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, ड्रेनेज आणि सार्वजनिक सुविधांवर अपेक्षित यश मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.






