रत्नागिरी – भारतीय जनता पक्षाने कोकणातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यावी आणि तिकडे नेलेले चांगले प्रकल्प कोकणात आणावेत अशी सूचना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारला केली आहे. त्यांनी आज बारसू येथील आंदोलकांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की मी मुख्यमंत्री असतानाच्या काळात बारसूची जागा रिफायनरीसाठी सुचवली होती, पण काहीही करा लोकांची डोकी फोडा आणि हा प्रकल्प राबवा अशी भूमिका आम्ही घेतलेली नव्हती. गेल्या काही दिवसांत वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग पार्क असे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले गेले. त्या प्रकल्पांबाबत कोणताच वाद नव्हता. असे चांगले प्रकल्प गुजरातला न्यायचे आणि प्रदुषणकारी हानीकारक प्रकल्प कोकणात आणायचे हे चालणार नाही.
ठाकरे बारसूला आले असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचे बंधु निलेश राणे यांनी बारसू प्रकल्पाच्या समर्थनार्थ येथे मोर्चा काढला होता. निलेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला समर्थन दिले होते पण आता ते विरोधात असल्यानेच केवळ ते या चांगल्या प्रकल्पाला विरोध करीत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी सरकारला आंदोलकांशी चर्चा करून संवाद साधण्याची सुचना केली. ते म्हणाले की आम्ही सत्तेवर असताना समृद्धी महामार्गाला असाच विरोध झाला होता. पण आम्ही त्यावेळी निदर्शकांशी संवाद साधला होता.उद्धव ठाकरे यांनी बारसू सोलगाव येथे आज सभा आयोजित केली होती पण त्यांच्या सभेला अनुमती नाकारण्यात आली. पण त्यांना आंदोलकांशी चर्चा करण्याची अनुमती देण्यात आली होती. या संबंधात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की केवळ राजकीय लाभासाठी या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकल्पासाठी पाच हजार एकर जमीन लागणार असून त्यापैकी 2900 एकर जमीन असलेल्या मालकांनी प्रकल्पाला मान्यता दिली आहे.