Rajesh Sawant Death : महाराष्ट्रातील भाजप नेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; CM फडणवीसांनी व्यक्त केले दुःख
Rajesh Sawant Death : भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Rajesh Sawant Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान –
राजेश सावंत यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत रत्नागिरी भाजपच्या संघटनात्मक विस्तारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आक्रमक वक्तृत्व, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची शैली आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले.
उदय सामंत यांचे विश्वासू सहकारी –
राजेश सावंत हे एकेकाळी पालकमंत्री उदय सामंत यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. मात्र, अंतर्गत मतभेदांनंतर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. नंतर काही आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहिले.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त –
राजेश सावंत यांच्या निधनाची बातमी समोर येताच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आणि कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कोकणातील राजकारणाने अभ्यासू, कार्यतत्पर आणि संघटनक्षम नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली-
भाजपाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांनी निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य केले. जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता ही त्यांची वेगळी ओळख होती. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाची विचारधारा रुजवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. समाजाप्रती बांधिलकी असणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती.






