T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या स्वागतासाठी गुजरातची बस; विरोधकांनी सरकारला सुनावलं… ‘हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान’

Gujarat Bus | T20 World Cup 2024 | Mumbai : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून मायदेशात दाखल झाली आहे. विजेत्या संघाचं राजधानीत दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा केली.
आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती टीम इंडियाच्या विजयी रॅलीची. टीम इंडिया मुंबईत दाखल होणार असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा विजयी झाली होती. त्यावेळी देखील टीमची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती. 17 वर्षांनंतर या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत.
मुंबईत विमानतळावर दाखल झाल्यानंतर टी इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे मैदानापर्यंत ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या मिरवणुकीच्या ताफ्यात गुजरातच्या बसेस असणार आहेत.
यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गुजरातच्या बसेस समावेश असल्याचा आरोप नाना पटोले, आमदार बच्चू कडू आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील याला विरोध केला असून, शिंदे सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदित्य ठाकरेला प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याशिवाय काय येतं. गुजरातहून बस आणली तर गैर काय? गुजरात काय पाकिस्तानमध्ये येतं का?’, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.
गुजरात मधील ‘आका’समोर हे महायुती सरकार झुकले – नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात मधील ‘आका’समोर हे महायुती सरकार झुकते. गुजरातच्या बसेस इथे आणून महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान यानिमित्ताने महायुती सरकारने करत आहे, असा घाणाघात केला. राज्य सरकार हे गुजरात धार्जिने आहे. ते त्यांना ‘आका’ म्हणतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रातील महायुती सरकारचे ‘आका’ आहेत. टीम इंडिया विश्वकप जिंकला आहे. त्याची रॅली मुंबईत निघत आहे. त्या रॅलीसाठी गुजरातमधून बसेस आणणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील महायुतीचे सरकार गुजरात आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राचा असा एकदा नाही वारंवार अपमान झाला असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केली.





