नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल्स आले होते. एयू म्हणजे “आदित्य उद्धव’ असे बिहार पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सादर केली. यामुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटणार आहे.
लोकसभेत आज अंमलीपदार्थविरोधातील धोरणांवर चर्चा सुरू होती. या चर्चेत राहुल शेवाळे यांनीही सहभाग घेतला. याच मुद्द्यांवर त्यांनी ड्रग्सविरोधी कारवाई फक्त सेलिब्रेंटीविरोधात होते, इतर प्रकरणात कारवाई होत नाही असा दावा केला. तसेच, सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही ड्रग्सचा मुद्दा उपस्थित झाला होता.
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी तीन पातळ्यांवर झाली. मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून याप्रकरणाची चौकशी झाली. मात्र, तिन्ही यंत्रणांकडून आलेल्या अहवालात तफावत आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला एयू नावाने 44 कॉल आले होते. या “एयू’बाबत मुंबई पोलिसांनी वेगळा अहवाल दिला होता. तर, बिहार पोलिसांनुसार “एयू’ म्हणजे आदित्य उद्धव’ आहे. याबाबत सीबीआयने अद्याप अहवाल दिलेला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला 44 कॉल केलेला एयू नक्की कोण याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी खोटे आरोप – आदित्य ठाकरे
राज्यातील खरे प्रश्न बाजूला सारून अशा प्रश्नांवरून बदनामी करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला जात आहे. एनआयटी भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य प्रश्नानांवरून लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे पुढे केले जात आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.