Suryansh Prince Debut : वैभवचे पदार्पण पुन्हा लांबणीवर! पण एकाच वेळी ‘या’ दोन युवा खेळाडूंना मिळाली टीम इंडियात एन्ट्री
Suryansh Prince Debut : सर्वांना उत्सुकता असलेला १५ वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याला या सामन्यातही प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळालेले नाही

IND vs IRE 2nd T20I Suryansh Prince Debut Vaibhav Missing : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. सर्वांना उत्सुकता असलेला १५ वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याला या सामन्यातही प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळालेले नाही. मात्र, भारतीय संघाने या निर्णायक सामन्यात दोन युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कॅप देत पदार्पणाची मोठी संधी दिली आहे. फलंदाज सूर्यांश शेडगे आणि वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव हे दोघे या सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करत आहेत. प्रिन्स यादवने यापूर्वीच वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
नव्या खेळाडूंबद्दल काय म्हणाला कॅप्टन श्रेयस अय्यर?
मालिकेतील या अंतिम सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीच्या वेळी दोन्ही नवख्या खेळाडूंचे कौतुक करताना कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “सूर्यांश शेडगे हा अत्यंत मजबूत आणि आक्रमक फलंदाज आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने धावा कुटल्या आहेत. त्याच्याकडे ‘इंडिया ए’ संघाचा चांगला अनुभव आहे. तसेच प्रिन्स यादववर आम्ही कोणताही अतिरिक्त दबाव टाकू इच्छित नाही. त्याने पहिला सामना बाहेर बसून पाहिला आहे, त्यामुळे तो येथील वातावरणाशी स्वतःला सहज जुळवून घेईल.”
सूर्यांश आणि प्रिन्सची कामगिरी; वैभवचे लक्ष इंग्लंड मालिकेवर –
Welcoming #TeamIndia T20I Caps No. 1️⃣2️⃣0️⃣ and 1️⃣2️⃣1️⃣ 🧢👏
Things we love to see, as Suryansh Shedge and Prince Yadav are set to make their debuts 🌟
Updates ▶️ https://t.co/L8GAMNqUC4#IREvIND pic.twitter.com/XNhYh1bHB8
— BCCI (@BCCI) June 28, 2026
सूर्यांश शेडगेने अलीकडेच ‘इंडिया ए’ संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर चमकदार कामगिरी केली होती, जिथे त्याने ७२ धावांची वादळी खेळी खेळण्यासोबतच २ विकेट्सही घेतले होते. दुसरीकडे, प्रिन्स यादवने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती, ज्यात त्याने २ सामन्यांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान, पुन्हा एकदा संधी हुकलेला वैभव सूर्यवंशी आता आगामी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, जिथे त्याला पदार्पणाची खात्री मिळू शकते.
मालिका वाचवण्यासाठी भारताची कसोटी –
दोन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या १-० ने मागे आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताचा ३४ धावांनी पराभव करत इतिहास रचला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला हरवण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडिया मैदानात पूर्ण ताकदीने उतरली आहे.





