IND vs AUS 2nd T20 : कोहलीचा ‘हा’ विक्रम मोडण्याची सूर्यकुमारकडे संधी, दुसऱ्या T20 मध्ये करू शकतो कमाल…

Suryakumar Yadav close to breaking Virat Kohli’s record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गेल्या सामन्यात भारतानं रोमहर्षक विजयाची नोंद केली होती. सूर्यकुमार यादवने 80 धावांची खेळी केली होती. सूर्याला पुन्हा एकदा कमाल दाखवण्याची संधी आहे. तो विराट कोहलीचा एक खास विक्रम मोडू शकतो. यासाठी त्याला काही धावांची गरज आहे.
वास्तविक, सूर्या आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 2000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. बाबर आझमने या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 2000 धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवानही या प्रकरणात संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवान आणि बाबरने 52 डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर कोहलीने यासाठी 56 डाव घेतले आहेत. सूर्याने 51 डावात 1921 धावा केल्या आहेत. त्यांना आता 79 धावांची गरज आहे.
सूर्यकुमारने भारतासाठी आतापर्यंत 54 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 1,921 धावा केल्या आहेत. सूर्याने 3 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम टी20 धावसंख्या 117 धावा आहे. त्याचा एकदिवसीय विक्रम पाहिला तर तो फारसा चांगला राहिला नाही. त्याने 37 सामन्यात 773 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने एक कसोटी सामनाही खेळला आहे.
दरम्यान, #INDvAUS टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 8 विकेट्स गमावून सामना जिंकला. सूर्यकुमार यादवने 80 धावांची शानदार खेळी केली. आता टीम इंडिया तिरुअनंतपुरममध्ये मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यानंतर 28 नोव्हेंबरला गुवाहाटी येथे सामना होणार आहे.





