Supriya Sule: “दिमागी नक्षल म्हणजे नेमकं काय?” सुप्रिया सुळे भडकल्या; पंतप्रधान कार्यालयालाच विचारला जाब
Supriya Sule: वंदे मातरम् वादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा; अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण सुरू असल्याचा आरोप.

Supriya Sule – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दिमागी नक्सलचा उल्लेख करून देशासमोर नवी समस्या असल्याचे सांगितले. मात्र, दिमागी नक्सल म्हणजे नेमके काय, हे आधी पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुळे सोमवारी पुणे दौऱ्यावर होत्या. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच सुळे यांनी सरकारला विविध प्रश्नांवर जाब विचारला. सुळे म्हणाल्या, की नक्षलवाद म्हणजे काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. जंगलातला नक्षलवाद काय आहे, हेही देशाला माहिती आहे. मात्र, दिमागी नक्सल ही कोणती नवी व्याख्या आहे? त्यात कोणाचा समावेश होतो? त्याचे निकष काय आहेत, याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाने द्यावे.
मूलभूत प्रश्न बाजूला
वंदे मातरमच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर सुळे म्हणाल्या, बावनकुळे हे केवळ मागणी का करीत आहेत? ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. गुन्हा दाखल करण्याचे अधिकार असतील, तर त्यांनी थेट कारवाई करावी. महायुती सरकारकडे आपल्या अपयशावर बोलण्यासाठी काही उरलेले नाही. त्यामुळे वंदे मातरमसारखे भावनिक मुद्दे पुढे करून जनतेचे लक्ष रस्ते, शिक्षण, परीक्षा आणि भ्रष्टाचारासारख्या मूलभूत प्रश्नांपासून दूर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.





