Supriya Sule | राज्यात विरोधकांना निधी नाकारला जातो, केंद्रात तसे होत नाही – सुप्रिया सुळे यांचा आरोप

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जनजीवन मिशनच्या कामासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळतो. परंतु, राज्य सरकारकडून विरोधकांच्या मतदार संघातील विकासकामांना निधी दिला जात नाही, ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. केंद्र सरकारमध्ये विरोधक असले तरी विकासकामे चालू राहतात. मात्र राज्यात विरोधक असल्याने निधी डावलला जात असून ही नवी राजकीय संस्कृती आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर राज्यातील आरक्षणासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, मराठी आरक्षणाबाबत जीआर काढण्यात आला. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून याबाबत नागरिक गोंधळात आहेत. सरकारमधीलच काही लोक वेगवेगळे विधाने करीत आहेत. या वक्तव्यामुळे वातावरण बिघडत आहे.
सरकारने कटुता वाढवू नये. याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवे. क्रिकेट सामन्याबाबत सुळे म्हणाल्या की, एकीकडे पाणी देत नाही म्हणायचे. दुसरीकडे क्रिकेट खेळता? भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का? सरकारने आपली भूमिका बदलली आहे का? अशी विचारणा केंद्र सरकारकडे करणार आहे.
राज ठाकरे यांचे स्वागतच…
समविचारी असलेल्या पक्षाशी, विचारधारा जुळणाऱ्या पक्षासोबत जाण्यास काहीच हरकत नाही. राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्ही अनेकदा स्वतंत्र लढलो आहोत. त्यामुळे ठाकरे गटाबाबत आम्हाला काही अडचण नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यात जलजीवन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी सुमारे ७० टक्के कामे अद्याप अपूर्ण असून अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत, असे सुळे यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





