Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर एकमत झाले. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी मतदारयादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला असून, १० मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिकृत घोषणा होऊ शकते. विशेष म्हणजे, ही निवडणूक ‘बिनविरोध’ पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वपक्षीय स्तरावर प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला आहे. मात्र, भारतीय संविधानातील कलम १६४(४) नुसार, कोणत्याही व्यक्तीला विधिमंडळाचे (विधानसभा किंवा विधान परिषद) सदस्य नसताना केवळ सहा महिन्यांपर्यंतच मंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर राहता येते. हे पद कायम ठेवण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत निवडून येणे अनिवार्य आहे. sunetra pawar याच घटनात्मक तरतुदीची पूर्तता करण्यासाठी सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश करणार आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीतील दुसरा मोठा निर्णय म्हणजे पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावणे. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहभागाने पार पडलेल्या या बैठकीत पार्थ पवारांना केंद्रीय राजकारणात सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पवार कुटुंबाची तिसरी पिढी आता दिल्लीच्या राजकारणात पक्षाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.