Nepal Disaster : ‘मदत नको, नुकसानभरपाई द्या!’ नेपाळचा भारत, अमेरिका, चीनला थेट इशारा; 5 अब्ज डॉलरची मागणी
Nepal Disaster : नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमनदी आपत्तीनंतर नेपाळने भारत, अमेरिका आणि चीनकडे हवामान नुकसानभरपाईची मागणी केली आहे. आपत्तीत १,००३ जणांचा मृत्यू झाला असून ५ अब्ज डॉलरच्या नुकसानीचा अंदाज आहे.

Nepal Disaster : नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या भीषण आपत्तीत आतापर्यंत १,००३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४ हजार जण बेपत्ता आहेत.
या पार्श्वभूमीवर नेपाळने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केवळ मदत मागण्याऐवजी हवामान बदलासाठी जबाबदार ठरवलेल्या प्रमुख उत्सर्जक देशांकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. भारत, अमेरिका आणि चीनकडे नेपाळने विशेषतः लक्ष वेधले आहे.
नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी ‘द काठमांडू पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत नेपाळचा जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनातील वाटा अत्यल्प असतानाही हवामान बदलाचा मोठा फटका देशाला बसत असल्याचे सांगितले.
चीन हा जगातील सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश असून त्यानंतर अमेरिका आणि भारताचा क्रमांक लागतो. त्यामुळे या औद्योगिक देशांची ऐतिहासिक जबाबदारी असून नेपाळसारख्या हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील देशांना नुकसानभरपाई मिळायला हवी, असे खनाल यांनी म्हटले.
‘दान किंवा भीक नको, न्याय हवा’
नेपाळ सरकारने आंतरराष्ट्रीय सहकार्य करणाऱ्या देशांना ‘हवामान नुकसानभरपाई दावा पत्र’ पाठवले आहे. ही मागणी आर्थिक मदत किंवा दान म्हणून नसून कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीच्या आधारावर असल्याचे खनाल यांनी स्पष्ट केले.
‘ही साधी पूरस्थिती नव्हती’
२६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या महापुराचे वर्णन खनाल यांनी ‘हिमालयीन सुनामी’ असे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुराच्या लाटा २० ते ३० मीटर उंच होत्या आणि पाण्याचा वेग ताशी १८० किलोमीटरपर्यंत पोहोचला होता.
हिमालयातील ग्लेशियर वेगाने वितळत राहिल्यास गंगा आणि त्रिशूलीसारख्या नद्यांवर अवलंबून असलेल्या दक्षिण आशियातील २ अब्जांहून अधिक लोकांच्या जलसुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
पुनर्बांधणीसाठी ५ अब्ज डॉलरची मागणी –
‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, नेपाळने या आपत्तीत झालेल्या नुकसानीचा अंदाज ५ अब्ज डॉलर इतका व्यक्त केला आहे. पुनर्बांधणी आणि आपत्तीतून सावरण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘क्लायमेट-डिझास्टर रिकव्हरी फंड’कडून तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.
नेपाळच्या कृषी, वन आणि पर्यावरण मंत्रालयातील हवामान बदल विभागाचे प्रमुख महेश्वर ढकाल यांनी मानवी कारणांमुळे होणाऱ्या हवामान बदलामुळे अशा आपत्तींसाठी अनुकूल परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे सांगितले. कमी उत्सर्जन करणाऱ्या देशांनाच हवामान बदलाचा तुलनेने अधिक फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आपत्तीत नेपाळमध्ये ९८७, तर तिबेटमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये मिळून सुमारे ४ हजार जण अद्याप बेपत्ता आहेत. १० हजारांहून अधिक नागरिकांना विमानाद्वारे किंवा बचाव मोहिमेतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, १५८ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून २७५ हून अधिक भारतीय अद्याप संपर्काबाहेर आहेत.





