Sugar Price Hike : “…दारुचे भाव 10 पटीने वाढवा”; साखर दरवाढीवरुन माजी मंत्र्यांचा फडणविसांना अजब सल्ला
Sugar Price Hike : साखर दरवाढीचा सामान्य ग्राहकांना फटका

Sugar Price Hike : देशभरात साखरेच्या किमतीत अलिकडे मोठी वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये साखरेच्या घाऊक दरातही मोठी वाढ झाली आहे. कमी उत्पादन, घटलेला प्रारंभिक साठा आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. तसेच काही बड्या व्यापा-यांनी साखरेचा साठा केल्याची चर्चा सुरू आहे.
चहा, शिरा, लाडू, पुरणपोळीपासून मिठाईपर्यंत सर्वच पदार्थांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढणार आहे. 50 रुपये किलीने मिळणारी साखर सद्या 70 ते 80 रुपयांवर गेली आहे. या वाढत्या दराचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे.
साखरेच्या वाढत्या भावासंदर्भात माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अजब मागणी केली आहे. साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारुचे भाव दहा पटीने वाढवा, अशी मागणी सावजी यांनी केली आहे.
साखरेचे भाव निम्म्यावर आणण्यासाठी…
सणासुदीचे दिवस असल्याने सरकारने महसूल वाढवण्यासाठी दारूच्या किमतीत दहा पटीने वाढ करावी व साखरेचे भाव निम्म्यावर आणावे. शिवाय सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी सामान्य नागरिक त्या विरुद्ध आंदोलन करत नाहीत, कारण त्यावर पोलीस केसेस होतात. त्यामुळे आपण जे करत आहात ते सर्वच बरोबर आहे असं नाही, असा टोमणाही सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.
दरम्यान, साखर दरवाढीचा सामान्य ग्राहकांना फटका बसत आहे. मात्र, शेतकऱ्यांना या वाढत्या दराचा कुठेही फायदा होताना दिसत नाही. दरम्यान, साखरेचे दर नियंत्रीत राखण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखरेच्या दरात झालेली वाढ कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्राची दरवाढ रोखण्यासाठी धडपड
दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढवून दरावर नियंत्रण आणण्याचा यामागचा उद्देश आहे. याशिवाय साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांच्या साठ्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे.
सरकारने बाजारातील उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. आयातीत साखर बाजारात दाखल झाल्यानंतर पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर काही प्रमाणात स्थिर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत सणासुदीच्या खरेदीचे गणित सर्वसामान्यांना जपून करावे लागणार आहे.
हेही वाचा :
Vadgaon Maval : इंद्रायणीचे आगार बहरले ! ९५ टक्के भात लागवड पूर्ण







