Subway Waterlogging: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेच्या भुयारी मार्गात पाणीच पाणी; जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास
Subway Waterlogging: पाणी साचल्याने भिंतीचा आधार घेत नागरिक ओलांडतात रस्ता; भूमिगत वीजवाहिन्यांमुळे ढेकू गावात शाॅर्ट सर्किटचा धोका.

Subway Waterlogging – तालुक्यातील साजगाव-आडोशी मार्गावरील ढेकू गावाजवळ असलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील या भुयारी मार्गाचा वापर ढेकू, टेंबेवाडी, चिंचवली, होनाड, आटकरगाव आणि आडोशी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर करतात.
तसेच पंचक्रोशीतील औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून ढेकू ग्रामस्थांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठीदेखील याच मार्गाचा वापर करावा लागतो. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना गटारे बांधून त्यावर स्लॅब टाकण्याची आवश्यकता असल्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
महामार्गालगतची गटारे कचरा व मातीने भरल्याने पावसाचे पाणी गावात शिरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या संदर्भात साजगाव ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला लेखी नोटीस देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी खासगी कंपन्यांसाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पाणी साचल्यानंतर नागरिक भिंतीचा आधार घेत मार्ग ओलांडतात. अशावेळी वीजवाहिन्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
“मागील वर्षी याच ठिकाणी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अजून एखादी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?”
– चिंतामण चव्हाण, विभागप्रमुख, शिवसेना (उबाठा)





