Stray Dog Menace : पिंपरी-चिंचवडकरांचा जीव मुठीत! १ लाख भटके कुत्रे अन् वर्षाला २९ हजार जणांना चावा…धक्कादायक वास्तव
Stray Dog Menace : खाद्यपदार्थ विक्रेते आणि उघड्यावरील कचऱ्यामुळे शहरात वाढला भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; लहान मुले आणि पादचारी निशाण्यावर.

Stray Dog Menace – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे. अश्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच शहरातील प्राणीप्रेमीकडून त्यांना अन्न मिळत असल्याने शहरात कुत्र्यांची संख्या वाढत आहे. शहरात अंदाजे एक लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. या कुत्र्यांमुळे शहरातील नागरिकांचे बाहेर फिरणे मुश्कील झाले आहे.
टपर्या, खाद्यपदार्थ, चायनीज विक्रेते, नागरिक व कुत्रीप्रेमींकडून तसेच, उघड्यावर व कचराकुंडीत सहजपणे खाद्य मिळत असल्याने मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पादचार्यांवर कुत्री धावून जातात. अचानक अंगावर कुत्री आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी वाहन पळविताता किंवा पळताना अपघात होतात.
रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन जावे लागते. कुत्र्यांच्या चाव्यामुळे तसेच, अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: लहान मुलांवर हल्ला करून त्यांचा चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वर्षांला २९ हजार जणांना कुत्री चावत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट कुत्री पकडून त्याच्यावर नसबंदी (निर्बिजीकरण) शस्त्रक्रिया केली जाते. एका शस्त्रक्रियेसाठी महापालिका सुमारे १ हजार रूपये खर्च करते. महापालिकेकडून दिवसाला अवघ्या ८ ते १० कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे एक लाख भटकी कुत्री असलेल्या एवढ्या मोठ्या शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात कशी येणार हा मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन अयपशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. तर, भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना अन्न व खाद्य देणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला प्राणिप्रेमींनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे शहरात किती नागरिक, संस्था भटक्या कुत्र्यांना अन्न देतात, याची नोंद महापालिकेकडे नाही.
तक्रारींवर कारवाई होत नसल्याने संताप
महापालिकेकडे तसेच, सारथी हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर काही तक्रारींवर कारवाई न करताच ती बदं केली जाते. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कुत्री पकडण्यासाठी पथक पाठविले जाते. सायंकाळनंतर कुत्री त्रास देत असल्यास त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे






