Omar Abdullah – मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरबाहेरील राज्यांमध्ये काश्मिरी नागरिकांचा, विशेषतः विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांचा, कथित छळ तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. काश्मिरी लोकांचा सतत होणारा छळ अस्वीकार्य असून यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला. मात्र, पीडीपी आमदार वाहिद-उर-रहमान पारा यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती अब्दुल रहीम राथर यांनी फेटाळून लावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, त्यांनी उत्तर विभागीय मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत हा विषय उपस्थित करून सर्व मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्याची विनंती केली होती. उत्तराखंडमध्ये झालेल्या घटनांप्रकरणी तेथील सरकारने तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. मात्र, शेजारील हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार असूनही काश्मिरी नागरिकांच्या छळाच्या घटना समोर येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून अशा घटना थांबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. संसदेतील अलीकडील वादांबाबत विचारले असता, अब्दुल्ला म्हणाले की, संसद आणि विधानसभांचे अधिकार वेगळे असून एकमेकांच्या कामकाजावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.