ST Bus Accident – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील पाटस हद्दीत अक्कलकोटवरून पुणे दिशेला जाणारी एसटी बस उलटून अपघात झाला. मात्र, बसमधील ४४ प्रवासी थोडक्यात बचावले असून तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवार (दि.२०) रोजी पहाटे दोनच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला जोडणारा बारामती फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी भीषण आणि जीवघेणे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या वेगवेगळ्या अपघात आतापर्यंत दोघांचा जागीच मृत्यू तर चारपेक्षा अधिक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि २०) रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटवरून पुणे दिशेला जाणारी एसटी बस (एम.एच.०३ बी.डब्ल्यू.८४३८) उलटून अपघात घडला. या बसमध्ये अंदाजे ४४ प्रवासी प्रवास करीत होते. या पैकी काही प्रवासी या अपघातात किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी सातत्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी ३१ डिसेंबर २०२५ रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भंगाराच्या दुकानात मालवाहतूक कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात भंगार गोळा करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मजूर जखमी झाल्याची घटना घडली होती. एसटी बस तसेच ३ जानेवारी २०२६ रोजी या ठिकाणी एका हायवा वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ जानेवारी २०२६ रोजी ट्रकने चारचाकी कार वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देऊन अपघात झाला होता. या अपघातात दोन महिलांना दुखापत झाल्याची घटना घडली होती. फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी सिमेंट वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक उलटून अपघाताची घटना घडली होती. यावेळी प्रसंगावधाने दोन दुचाकीचालक थोडक्यात बचावले होते. दरम्यान, सध्या पुणे-सोलापूर महामार्ग आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला बारामती फाटा येथे जोडणाऱ्या साठी उड्डाणपुलाचे बांधकाम सोलापूर महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे सध्या ही महामार्गावरील वाहतूक महामार्गाच्या पुणे बाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरून सुरू ठेवली आहे. परिणामी या ठिकाणी खोदकाम केल्याने आणि रस्ता वाकडा तिकडा केल्याने आणि वळण असल्याने वाहन चालकांचा गोंधळ उडत असून त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या किरकोळ अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला जोडणाऱ्या बारामती फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. संबंधित ठेकेदाराने दोन कर्मचारी नेमणूक करुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठेवण्याची आवश्यकता आहे. रस्त्यांच्या बाजुला मजबूत संरक्षक कवच बांधण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी पुरेशी उपाययोजना केली गेली नाही परिणामी जीवघेणे अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे.