नवी दिल्ली- कॉंग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यासाठी सोनिया गांधींकडून पक्षाबाबतच्या प्रामाणिक बांधिलकीच्या निकषाला सर्वाधिक महत्व दिले जाणार आहे. गांधी कुटुंबीयांशी जवळच्या पक्षातील स्रोतांनी ही माहिती दिली. पक्षाबाहेरील नव्या चेहऱ्यांना पक्षामध्ये अधिक महत्व दिले जाऊ लागल्यामुळे पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या असंतोषाचे वातावरण आहे. म्हणूनच सोनिया गांधींनी पक्षाबाबतच्या बांधिलकीला अधिक महत्व देण्याचे ठरवले आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 10 ऑगस्टला झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा कार्यकारी अध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सोनिया गांधी यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
हरियाणा कॉंग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी अशोक तंवर यांच्या जागेवर कुमारे शेलजा यांना प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले. तर गटबाजीमध्ये समतोल साधण्यासाठी भूपिंदर सिंह हुडा यांच्याकडे अन्य दोन जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्याच प्रमाणे मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिलिंद देवरा यांनी सोडल्यावर ती जबाबदारी एकनाथ गायकवाडांकडे दिली गेली. आता देवरा यांच्याकडे अधिक महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
त्याच प्रमाणे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनिल लाखर यांनीही राजीनामा देऊ केला होता. पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत लाखर यांचा पराभव सनी देओल यांनी केला होता. झारखंड प्रदेशाध्यक्ष म्हणूनही रामेश्वर ओरोन यांना नियुक्त केले गेले आहे.
आता मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीसांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी सोनिया गांधींनी 2004 पासूनच्या लोकसभा आणि राज्यसभेतील कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. 204, 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निवडून आलेल्या खासदारांशीही त्या चर्चा करत आहेत.