मुंबई : आंबेडकरी अनुयायाकडून काल (दि. ०९) सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता. मात्र, हा लॉंग मार्च पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने नाशिक येथेच थांबवण्यात आला. तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकणावर भाष्य करताना, पोलिसांबद्दल त्यांची मवाळ भूमिका दिसून आली. त्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आमदार सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं आहे. काय म्हणाले विजय वडेट्टीवार? विजय वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि परभणीमध्ये दुसरी भूमिका घ्यायची, हा माणूस दुटप्पीपणा करत असल्याचे दिसत आहे. सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करत आहेत, हे त्यातून दिसत आहे. दलित व्यक्तीचा खून होतो, तेव्हा पोलिसांना संरक्षण देण्याची भाषा वापरली जाते. मात्र, जो दोषी असेल तो सुटता कामा नये, सुरेश धस यांना जातीचा स्पर्श, गर्व असल्याचा भास होत आहे. त्यांच्या या दुटप्प पणाचा मी निषेध करतो. तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांनी खून केला आहे, कोणीही सुटता कामा नये, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तर, सोमनाथ सुर्यवंशी मारले गेले आहेत, सुरेश धस यांनी पांघरुण घालू नये, अशा शब्दात आमदार सुरेश धस यांच्यावरही विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. …तर वाल्मिक कराडलाही माफ करावे : जितेंद्र आव्हाड एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे. दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, ‘जाऊ द्या, त्याला माफ करा’, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा-त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे. सुरेश धस यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही; भीम आर्मीकडून इशारा सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या पोलिसांनी हत्या केली त्या पोलिसांना माफ करा, त्यांना एक संधी द्यावी, त्यांच्यावर गुन्हा नोंद करू नका, असे जाहीर चुकीचे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. आमच्या भावना दुखावल्या आहेत, सुरेश धस यांच्यावर तात्काळ अट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आमदार सुरेश धस यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही, असा इशाराच भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.