नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज लाखो रुग्ण आढळत असल्यामुळे औषध आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यातच आता करोना टेस्टसाठी आवश्यक असलेले किटही कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे करोना चाचणीसाठी घेतलेल्या स्वॅबचे रिपोर्ट येण्यास विलंब होत आहे. यावर उपाय म्हणून ‘एम्स’च्या तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
चाचणीचा अहवाल येण्यास उशीर झाल्यास रुग्णाने अहवालाची वाट पाहात बसून राहायचं का, या संदर्भात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले की, जर एखाद्याची टेस्ट झाली नाही किंवा रिपोर्ट येण्यास उशीर लागत असेल अशा वेळी करोनाचे लक्षण असलेल्या रुग्णाला या महामारीच्या काळात करोनाबाधित मानावं. त्यानुसार त्या व्यक्तीवर उपचार सुरू करावे, असंही त्यांनी सूचवलं म्हटलं.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, आता ‘क्लिनिकल सिमटम्स’ अर्थात लक्षणांवरून कोणालाही करोना पॉझिटीव्ह मानलं जावं. सध्याच्या काळात ताप, अंगदुखी, खोकला आणि सर्दी असेल तर त्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता अधिक आहे. तसेच आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह आला तरीही लक्षणं असतील तर करोनाची बाधा झाल्याचं समजून चालावं, असंही डॉ. गुलेरिया यांनी नमूद केलं.
दरम्यान ऑक्सिजन 94 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास घाबरण्याचं कारण नाही. याचा अर्थ शरिराच्या प्रत्येक भागाला पुरेसा ऑक्सिजन मिळत आहे. मात्र ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करू नये, जेणेकरून तो ऑक्सिजन इतरांना उपयोगी ठरू शकतो, असंही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.