मुंबई : कोरोनामुळे देशासह राज्यातील अनेक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता मुंबईतील गणेशोत्सवाच्या निर्णयानंतर आता गोपाळकाला म्हणजेच दहिहंडी उत्सव देखील साजरा करणार नसल्याचे दहिहंडी समन्वय समितीने जाहिर केले आहे. दहिहंडी उत्सव यंदा होणार नाही व तो साजरा केला जाऊ नये असे आवाहन दहिहंडी समन्वय समितीने सर्व मंडाळांना केले आहे.
दहिहंडी समन्वय समितीच्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला, ‘सर सलामत, तो पगडी पचासचा’ नारा देत दहिहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचं समितीनं जाहिर केलं. 2020 हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने जरा अवघडच जात आहे. गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले आहे. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि अबालवृध्दांचा, आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. 2020 च्या या कोरोना संकटाने, या महामारीने मात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.
कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्य सुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यू आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर (Social Distancing ) हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे?, असं समितिनं म्हटलं आहे.