Shrirang Barne – शहरात विकासकामे, नवीन प्रकल्प राबविण्यापेक्षा पाणी, स्वच्छता, आरोग्य अशा मुलभूत सुविधा किती सक्षमपणे दिल्या जातात, हे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांपेक्षा मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात देण्यावर भर द्यावा, असा सल्ला खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे यांनी सोमवारी (दि. ६) महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, महापालिका गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेवक निलेश तरस, निलेश बारणे, ऐश्वर्या तरस आदी उपस्थित होते. खासदार बारणे यांनी शहरवासीयांना अशुध्द व अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याची बाबा निदर्शनास आणून दिली. तसेच, देहूरोड, किवळे भागातील नाले नदीला मिळत आहेत. काही सोसायट्यांमधील सांडपाणीही थेटपणे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे रावेतमधून अशुद्ध पाणी उचलले जात आहे. शिवणे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत चाचपणी करावी. आंद्रा धरणातील शंभर एमएलडी पाणी निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येते. हे पाणी रावेतपेक्षा अशुद्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले. शुध्द, पुरेशा पाणीपुरवठा व टँकर बंद करण्यासाठी प्रशासनाने काम करावे, अशा सूचना बारणे यांनी केल्या. शहरातील उद्यानाची दुरवस्था झाली असून एकही उद्यान व्यवस्थित नाही. ठेकेदार राजकीय लोकांशी संबंधित असतात. बांधकाम विभागात दोन टक्के रेट… बांधकाम विभागात प्रत्येक टेबलवर दोन टक्के घेतल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, असे म्हणत महापालिकेतील प्रशासनाच्या खाबुगिरीचा रेट खासदार बारणे यांनी आयु्क्तांना यावेळी सांगितला आहे. तसेच, टेबल कमी करून बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही. बांधकाम विकसक, नागरिकाला तत्काळ परवानगी मिळाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.