Shrikant Shinde : महायुतीतील एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद आता कमालीचा तीव्र झाला आहे. सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी थेट खुले आव्हान दिले आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले, “गणेश नाईक यांना एवढीच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघात बाप-बेटे कोणीही उभे राहा, तुमची खुमखुमी उतरवतो. महायुतीतील मुख्य नेत्यांनाही विनंती आहे की, यांची खुमखुमी उतरवायची असेल तर उतरवू द्या.” त्यांनी पुढे म्हटले, “गणेश नाईक यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यांना एकदा नाही तर दोनदा माजी केले आहे. त्यामुळे बोलताना विचार करावा.” Shrikant Shinde नाईक-शिंदे वादाची पार्श्वभूमी हा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्यांना ‘कोंडीत पकडण्याचे’ काम भाजप नेत्यांनी दिले असल्याचे मानले जाते. नाईक यांनी सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. नुकतेच नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून त्यांनी शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर गंभीर आरोप केले. “नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी रुग्णालये, उद्याने आणि सार्वजनिक भूखंड देण्याची मागणी करत आहोत, पण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घालले जात आहेत. दलालांमार्फत हे काम होत आहे. मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने असे कृत्य केले याची लाज वाटते,” अशी बोचरी टीका नाईक यांनी केली होती. त्यांचा रोख स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्ष गणेश नाईक यांचा ठाणे जिल्ह्यात ३०-३५ वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर भाजपने त्यांना ठाणे जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची जबाबदारी दिली. शिवसेनेचा (शिंदे गट) जोर कमी करण्यासाठी नाईक यांनी जनता दरबार, जाहीर सभांमधून उघड इशारे देण्यापासून ते शाब्दिक हल्ले सुरू ठेवले आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना हा वाद आता निवडणुकीच्या मैदानात नेण्याचे संकेत दिले आहेत. हा संघर्ष आता फक्त शाब्दिक फैरींपुरता मर्यादित राहिला नसून, लोकसभा निवडणुकीच्या (येत्या काळातील) संदर्भात खुल्या आव्हानापर्यंत पोहोचला आहे. यामुळे ठाणे-कल्याण-नवी मुंबई भागातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.