Shreyas Iyer Statement : “टीकेला घाबरू नका, बिनधास्त खेळा!”; झिम्बाब्वे मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरचा युवा शिलेदारांना गुरुमंत्र
Shreyas Iyer Statement : पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पत्रकार परिषदेत आपल्या रणनीतीचा खुलासा केला.

Shreyas Iyer Statement in Press Conference ahead IND vs ZIM 1st T20I : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. २३ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पत्रकार परिषदेत आपल्या रणनीतीचा खुलासा केला. बाह्य टीका आणि असंतोषाच्या वातावरणातही युवा खेळाडूंनी ‘अपयशाच्या भीतीशिवाय’ बिनधास्त आणि आक्रमक क्रिकेट खेळावे, असे आवाहन अय्यरने केले आहे.
“अपयशाच्या भीतीने खेळू नका!” – अय्यरचा सल्ला
आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध सलग ६ सामने गमावल्यानंतर कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरवर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना अय्यर म्हणाला, “खेळाडूंनी अपयशाला अजिबात घाबरू नये. जेव्हा तुमच्या मनात भीती असते, तेव्हा तुम्ही स्वतःचे रक्षण करण्यासाठी खेळता. मात्र जेव्हा भीती नसते, तेव्हाच तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान देऊ शकता. बाहेर लोक काय बोलत आहेत? याचा विचार न करता आपण फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
वेळेची कमतरता आणि प्रवासाचा थकवा हेच मोठे आव्हान!
Ready to get going in Harare 🙌
🎥 Hear from Captain Shreyas Iyer on the excitement for the #ZIMvIND T20I series 💙#TeamIndia | @ShreyasIyer15 pic.twitter.com/PvR9CHVoMd
— BCCI (@BCCI) July 22, 2026
इंग्लंडहून थेट झिम्बाब्वेला पोहोचलेल्या भारतीय संघाला सरावासाठी अवघा एक दिवस मिळाला आहे. यावर बोलताना ३१ वर्षीय अय्यरने म्हणाला की, “इतक्या कमी वेळात येथील परिस्थितीशी जुळवून घेणे आव्हानात्मक आहे. परंतु, अशा कठीण परिस्थितीत विजय मिळवल्यास संघ म्हणून आत्मविश्वास द्विगुणित होतो. इंग्लंड दौऱ्यातील पराभवाने संघातील खेळाडूंना एकमेकांच्या अधिक जवळ आणले असून आम्ही आमच्या चुकांमधून धडे शिकलो आहोत, असेही त्याने नमूद केले.”
झिम्बाब्वेला हलक्यात घेणार नाही; स्वतःच्या दुखापतीवर भाष्य –
झिम्बाब्वे संघाचे कौतुक करताना अय्यर म्हणाला की, त्यांच्या अनेक खेळाडूंना आयपीएलचा (IPL) मोठा अनुभव असून ते एक अत्यंत स्पर्धात्मक संघ आहेत. तसेच, स्वतःच्या दुखापतीतून पुनरागमन करण्याच्या प्रवासावर बोलताना तो म्हणाला की, रिहॅबच्या (Rehab) टप्प्याने त्याला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनवले आहे.





