Shreyas Iyer : ‘आता त्याने आणखी काय करावे?’, श्रेयसच्या वडिलांचा निवड समितीला संतप्त सवाल; म्हणाले, ‘कर्णधारपद नको पण…’

Shreyas Iyer Father Reaction : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा भारतीय संघ व्यवस्थापनाच्या दुर्लक्षाचा सामना करावा लागला आहे. उजव्या हाताचा हा फलंदाज येत्या आशिया कपसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतरही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आशिया कप स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार असून, अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळवला जाईल. तत्पूर्वी श्रेयस अय्यरच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रेयसच्या दुर्लक्षावर वडिलांनी व्यक्त केली नाराजी –
आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरला स्थान न मिळाल्याने त्याचे वडील संतोष अय्यर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले, “श्रेयसला भारतीय टी-20 संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करावे लागेल, मला माहीत नाही. तो दरवर्षी आयपीएलमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ससाठी खेळताना त्याने कर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्याने 2024 मध्ये केकेआरला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आणि या वर्षी पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत नेले.”
कर्णधारपद नको पण संघात तरी घ्या –
श्रेयस अय्यरच्या वडिलांनी त्याच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. संतोष अय्यर म्हणाले, “मी हे नाही म्हणत की त्याला भारतीय संघाचा कर्णधार करा, पण किमान त्याला संघात तरी निवडा. जर त्याला संघातून बाहेर काढले गेले, तरी तो कधीही नाराजी व्यक्त करत नाही. तो फक्त म्हणतो, ‘ शेवची हे माझं नशीब आहे; आता यात काही करता येणार नाही.’ तो नेहमी शांत आणि संयमी राहतो. तो कोणालाही दोष देत नाही, पण आतून तो स्वाभाविकपणे निराश असेल.”
हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने घेतला धक्कादायक निर्णय! एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
श्रेयस अय्यरची कामगिरी –
उत्कृष्ट फॉर्म असतानाही श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळाले नाही. आयपीएल 2025 मध्ये श्रेयसने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 17 डावांमध्ये 604 धावा केल्या, यात त्याचा सरासरी 50.33 आणि स्ट्राइक रेट 175.07 होता. या हंगामात त्याने सहा अर्धशतके झळकावली. डाव नियंत्रित करण्याची त्याची क्षमता देखील उल्लेखनीय होती, ज्याचा अंदाज त्याच्या 79.1% कंट्रोल रेटवरून येतो. एवढ्या प्रभावी आकडेवारीनंतरही निवड समितीने त्याला एशिया कपच्या संघातून वगळले आहे. 30 वर्षीय या फलंदाजाचा संघाबाहेर राहणे त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.





