काबूल – काबूलच्या विमानतळाजवळ दोन दिवसांपूर्वी झालेल्या आत्सघातकी बॉम्बस्फोटांमागे केरळमधील 14 जणांचा हात असल्याची माहिती पुढे आली आहे. या बॉम्बस्फोटांनंतर तालिबानने तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेरून 2 पाकिस्तानी नागरिकांना स्फोटकांसह ताब्यात घेतले आहे.
या बॉम्बस्फोटांमागे इस्लामिक स्टेट खोरासान प्रोव्हिन्स या दहशतवादी संघटनेशी संबंधित 14 केरळी युवकांचा हात असल्याचीही माहिती पुढे येते आहे. या सर्व जणांना तालिबानने अलिकडेच बोगराम येथील तुरुंगातून सोडले होते.
अफगाणिस्तानातील सुन्नी पश्तुन दहशतवादी संघटनेकडून तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी दोन पाकिस्तानींची निवड करण्यात आली होती. हा स्फोट देखील 26 ऑगस्ट रोजीच करण्याची योजना होती. मात्र या दोन आत्मघातकी दहशतवाद्यांना स्फोट घडवण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे.
काबूलवर सध्या हक्कानी नेटवर्कचे नियंत्रण आहे. जलालाबाद-काबूल भागावर आणि पाकिस्तानी सीमेजवळीत नांगरहार प्रांतावर झद्रान पश्तुन टोळ्यंचे वर्चस्व आहे. नांगरहार प्रांतावर आयएसकेपीचेही नियंत्रण आहे. आयएसकेपी पूर्वी हक्कानी नेटवर्कच्या माध्यमातूनच सक्रिय होती. केरळमधील 14 जण याच संघटनेमध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी एकाने अलिकडेच केरळमधील आपल्या घरी संपर्क साधला होता. तर उर्वरित 13 जण अजूनही फरार आहेत.
इस्लामिक स्टेटने सीरियामधील 2014 मध्ये मोसूलचा ताबा घेतल्यानंतर केरळमधील मल्लापुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातील 14 जण इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघून गेले होते. यापैकी काही जण आयएसकेपी बरोबर अफगाणिस्तानमध्ये स्थायिक होण्यासाठी नांगरहारला आले होते. अशी माहिती मिळते आहे. मात्र यासर्व घडामोडींबाबत तालिबानकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. दरम्यान काबूल बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावणाऱ्या व्यक्तींची संख्या 200 च्या जवळ पोहोचली आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचाही समावेश आहे.