Pune District : वेल्हे तालुक्याच्या विकासाला खिळ घालणाऱ्या पुढाऱ्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील चेलाडी ते मढेघाट या रस्त्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीवर पुन्हा एकदा शिवसेनेने आवाज उठवला आहे. तालुक्याच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या राजकीय नेत्यांचा आणि पुढाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे.
शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री. उमेश काळुराम नलावडे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक, राजगड (वेल्हे) तसेच तहसीलदार श्रीनिवास ढाणे यांना निवेदन सादर करत या विषयात गंभीर भूमिका मांडली. नलावडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “वेल्हे-मढेघाट हा रस्ता गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्यामुळे महाड व पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग उभा राहणार आहे. तरीही तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष करून, पानशेत खोऱ्यातील घोलते–कुंभे रस्त्याला प्राधान्य दिले आहे. चर्चेत नसतानाही हा रस्ता मंजूर झाला, मात्र आमचा मढेघाट रस्ता आजही रखडलेलाच आहे.”
नलावडे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “या अन्यायाला आता जनता गप्प बसणार नाही. चेलाडी–मढेघाट हाच रस्ता मंजूर झाला पाहिजे, ही शिवसेनेची ठाम व आग्रही मागणी आहे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल.”
या निवेदनावर स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला आहे. अनेक ग्रामस्थांनी देखील या रस्त्याची गरज अधोरेखित करत, प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.
तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि गावागावातील संपर्क वाढवण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनीही व्यक्त केले. आता प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





