गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची शिशिर शिंदेंची मागणी; म्हणाले “मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई”

Shishir Shinde on Gajanan Kirtika| शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे. मात्र मुलाच्याविरोधात रवींद्र वायकर हे मैदानात आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून गजानन कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांचा प्रचार केला, तर दुसरीकडे आपल्या मुलाच्या विरोधातच प्रचार करण्याची त्यांच्यावर वेळ आली.
यासंदर्भात त्यांनी मुलाच्या टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, याची मला खंत असल्याचे म्हंटले. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
शिशिर शिंदे यांनी काय लिहिले पत्रात ?
शिशिर शिंदे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले की, “लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नीने पक्षविरोधी वक्तव्य करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली आहे. त्यामुळे ‘मातोश्रीचे लाचार श्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा,” अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पुढे त्यांनी पत्रात लिहिले की, “गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यानंतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच, गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्यांचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र, फायदा ठाकरे गटाला झाला.”
“परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा,” अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते गजानन कीर्तीकर?
अमोल त्याची संघटना सोडून कुठेच जाणार नाही, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि मी वन टू वन भेटून देखील अमोलला सांगितले होते. पण, तो शिवसेनेत आमच्यासोबत आला नाही, असा गौप्यस्फोटही कीर्तीकरांनी केला.
तसेच, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिलेले आहेत, ते लढत आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीला देखील महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावाच कीर्तीकर यांनी केला आहे. कीर्तीकरांच्या या विधानामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावताना दिसून येतात.
हेही वाचा :





