Shirur Politics: शिरूरच्या राजकारणात मोठा भूकंप? भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, नेत्यांचा बंडाचा इशारा
Shirur Politics: भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिरूर तालुक्यात भविष्यात धक्कादायक पक्षांतराची शक्यता.

Shirur Politics – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थगित झालेली निवडणूक आता केवळ बाजार समितीपुरती मर्यादित न राहता तालुक्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बाजार समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर एकीकडे माजी आमदार अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके,
घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, दामू घोडे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक नेते एकत्र आल्याने तालुक्यात नवीन राजकीय समीकरण आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, बाजार समितीच्या उमेदवारी वाटपावरून आणि प्रचार बॅनरवर अनेक ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे वगळल्याच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. पक्षातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप होत असून,
त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. भाजपमधील काही नेत्यांनी शिरूर तालुक्यातील पक्ष संघटना ही हवेलीतील काही नेत्यांच्या प्रभावाखाली गेल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली उमेदवारी वाटप झाल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. “आम्हाला आमचा कारभार करू द्या, अन्यथा आम्ही वेगळी भूमिका घेऊ,” असा इशाराही काही नेत्यांनी दिल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे व इतर पक्ष्यांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय झाल्याचे दिसून आले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटाने संपूर्ण तालुक्यात दौरे करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभर प्रचार दौरे केले.
भविष्यात धक्कादायक प्रवेशाची नांदी?
अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकालानंतर कार्यकर्त्यांकडून भावी आमदार असे बॅनर झळकून घेतले आहेत. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून तिकीट वाटपाबरोबरच अन्य ठिकाणी जी वागणूक मिळत आहे. त्यामुळे या वागणुकीला कंटाळून या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अशोक पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला तर वावगे वाटणार नाही.






